भुसा कंपनीला आग, सर्वत्र धूरच धूर; तीन कामगारांचा घात नेमका कशामुळे?

भुसा असल्यामुळे आग पसरली. भुसा पेटून धूर निर्माण झाला. या धुरात सापडल्याने कामगारांची पळापळ सुरू झाली.

भुसा कंपनीला आग, सर्वत्र धूरच धूर; तीन कामगारांचा घात नेमका कशामुळे?
| Edited By: | Updated on: Apr 24, 2023 | 10:32 PM

नागपूर : कटारिया अॅग्रो कंपनीत जाळण्यासाठी भुसा बनवला जातो. तसेच बायोगॅसची निर्मिती केली जाते. कंपनीत दोन शिफ्टमध्ये काम चालते. एका शिफ्टमध्ये १५ कामगार काम करतात. सोमवारी रोजच्या प्रमाणे काम सुरू झाले. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान कंपनीला आग लागली. भुसा असल्यामुळे आग पसरली. भुसा पेटून धूर निर्माण झाला. या धुरात सापडल्याने कामगारांची पळापळ सुरू झाली. काही कामगार लवकर बाहेर पडले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. काही कामगार ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. पण, धूर काही कमी होत नव्हता. श्वास गुदमरून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

केबलला ब्लास्ट झाल्याने आग

हिंगणा एमआयडीसीत मोठी दुर्घटना घडली. कटारिया अॅग्रो कंपनीला मोठी आग लागली. या दुर्घटनेत तीन कामगार होरपळून गेले. तसेच तीन जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आग लागली तेव्हा तिथं १५ कर्मचारी काम करत होते. इलेक्ट्रिक केबलला ब्लास्ट झाल्याने आग लागल्याचे सांगितले जाते.

दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण

तीन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अग्निशमन दलाचे बंब बोलावण्यात आले. पण, आग मोठी असल्याने नियंत्रणात येण्यास बराच वेळ लागला. दोन तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आले.

या कंपनीत बायोमासपासून बॅलेट बनवण्याचे काम होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. एक बायोमास भरलेला ट्रकही याठिकाणी जळाला. ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे ही आग दोन तास धुमसत राहिली.

जखमींवर चांगले उपचार व्हावेत

या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना समन्वय साधण्याचे निर्देश दिले. तीन जखमी कामगारांवर रुग्णालयात चांगले उपचार व्हावेत, यासाठी फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या आगीत कोट्यवधी रुपयांचे कंपनीचे नुकसान झाले. तीन कामगारांचे कुटुंब उघड्यावर आले. यामुळे या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले जात आहे.