पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो… अमित शाह यांनी… उद्धव ठाकरे यांचा पुन्हा हल्लाबोल

| Updated on: Jul 09, 2023 | 1:41 PM

काही झालं तरी आम्ही आमचा मित्र पक्ष शिवसेनेला सोडणार नाही. त्यांना आमच्यासोबतच ठेवू, असं भाजपने शरद पवार यांना सांगितलं होतं. तशी कबुलीच अजित पवार यांनी दिली आहे.

पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो... अमित शाह यांनी... उद्धव ठाकरे यांचा पुन्हा हल्लाबोल
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

यवतमाळ : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. आज ते यवतमाळमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच भाजपला जुन्या वायद्यांची आठवणही करून दिली. इतकेच नव्हे तर मी युतीतून बाहेर पडलो नाही तर मला भाजपने युतीतून बाहेर ढकललं, असा गंभीर आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन मी जाहीरपणे आधीच सांगितलं आहे. अमित शाह आणि माझ्यात बंददाराआड काय घडलं ते सांगितलं आहे. आज मी पोहरादेवीला आलोय. इथेही मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो आमच्यात अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचं ठरलं होतं. ते वचन शाह यांनी पाळलं असतं तर आज कदाचित भाजप किंवा शिवसेनाच मुख्यमंत्री होऊन गेला असता. आज भाजपला इतर पक्षातून आलेल्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या. तसेच भाजपच्या जुन्या, निष्ठावंत आणि मेहनती कार्यकर्त्याांना बाहेरून आलेल्यांची सरबराई करावी लागली नसती, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

ते मैत्रीचं लक्षण आहे का?

काही झालं तरी आम्ही आमचा मित्र पक्ष शिवसेनेला सोडणार नाही. त्यांना आमच्यासोबतच ठेवू, असं भाजपने शरद पवार यांना सांगितलं होतं. तशी कबुलीच अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे मित्र ओळखण्यात तुमची चूक झालीय असं वाटतं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं. मी चूक केली म्हणत नाही. मैत्री केलीच होती. पण युतीत जे ठरलं ते नाकारलं आणि मला युतीच्या बाहेर ढकललं. आता जी शिवसेना फोडली ते मैत्रीचं लक्षण असू शकतं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

पक्ष पळवला जातोय

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आला आहे. त्याकडे तुम्ही कसं बघता? असा सवाल उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. जसं दिसतं तसं बघतो. आणखी वेगळं कसं बघायचं? शिवसेना फोडण्यात आली. पूर्वी एक होतं, राजकारणात फोडाफोडी होत होती. आता पक्ष पळवला जात आहे. पक्ष पळवूनही जनतेच्या मनात प्रतिसाद आहे. त्याचं प्रत्यंतर सभेतपाहायला मिळालं. लोकं भेटत आहेत. जे घडलं ते चुकीचं आहे असं सांगत आहेत. आम्हाला पाठबळ देत आहे. आशीर्वाद देत आहेत, असं त्यांनी सांगितलं.