राज्यात आरक्षणावरून संघर्ष, आता ओबीसींना खुल्या गटात टाकण्याचा डाव; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राज्यात आरक्षणावरून संघर्ष निर्माण झालंय. आता ओबीसींना खुल्या गटात टाकण्याचा डाव असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

राज्यात आरक्षणावरून संघर्ष निर्माण झाला आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाऊन उपोषणाचा नारा दिला आहे. मराठा आंदोलकानंतर आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. आता ओबीसींना खुल्या गटात टाकण्याचा डाव सुरू आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
नाना पटोले यांनी आज शुक्रवारी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेतली. या भेटीनंतर नाना पटोले म्हणाले, ‘देशात 2400 च्या वर ओबीसींच्या जाती आहेत. या सरकारने जे काही, लोकांना आश्वासन दिलं. नरेंद्र मोदींनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन जातीनिहाय जनगणना करू, असे आश्वासन दिलं. परंतु निवडणुकीनंतर आश्वासन पाळले जात नाहीत. आता पुन्हा ओबीसींना ओपनमध्ये कसं टाकता येईल, असे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी 40 प्रश्न तयार केले, 10 व्या नंबरचा प्रश्न आहे. त्यातून असं दिसत आहे. आता ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा मानस आहे. आमची मागणी आहे की, जनगणना करताना अनेक जाती आहेत. कुणबी, बंजारा असेल. आंध्रप्रदेशात बंजारा समाजाला लामटा म्हणतात. तिकडे कर्नाटकात वेगळ्या नावाने ओळखतात. आम्हाला महाराष्ट्रात कुणबी म्हणतात. तिकडे कुर्मी म्हणतात. कुठे जाट म्हणतात. वेगवेगळ्या राज्यात भाषेच्या आधारावर वर्गीकरण केलं आहे. आता त्याचं अपडेटेशन होणं गरजेचं आहे. कारण ही नावे जातीनिहाय जणगणनेत येतील’.
‘खरंतर आता जातीनिहाय जणगणना केली म्हणून आव आणला जाईल. या ओबीसी समाजाला आर्थिक, सामाजिक न्याय मिळणार नाही. राजकीय लाभ मिळणार नाही. ओबीसी समाजाला पानं पुसली जाईल, अशी परिस्थिती आहे. बिहार आणि तेलंगणामध्ये जातनिहाय सर्व्हे केलं. हाच ड्राफ्ट केंद्र सरकारने केला. आमचे नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या दोघांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं. परंतु त्या पत्राचं उत्तर मोदी देत नाही. ओबीसींवर अन्याय करण्याची मानसिकता त्यांची झाली आहे. जनगणना सुरू झाली, ही जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यात जातीनिहाय जणगणना सुरू झाली आहे. तिथेच आम्हाला घोळ दिसत आहे. बिहार आणि तेलंगानामध्ये जसा सर्व्हे झाला. तशीच जातीनिहाय जणगणना व्हावी. यासाठी आम्ही राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधानांना कळवतो, असे नाना पटोले यांनी सांगितले.