जरांगेंची गणपती उत्सवातच मुंबईत आंदोलनाची घोषणा; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया चर्चेत
Cm Fadanvis On Manoj Jarange Patil Mumbai Protest : मनोज जरांगे पाटील यांनी गणपती उत्सवादरम्यान मुंबईत दाखल होऊन आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी गणपती उत्सवादरम्यान मुंबईत दाखल होऊन आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. छत्रपती शिवरायांना मानणाऱ्यांनी हिंदूंच्या सणांमध्ये विघ्न आणू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, जरांगेंच्या मुंबई आंदोलनाच्या घोषणेवर फडणवीसांची ही प्रतिक्रिया आता चर्चेचा विषय ठरली आहे.
मराठा आरक्षण हा मुद्दा राज्यामध्ये सातत्याने चर्चेत राहिला आहे. गेली 13 दिवस झाले मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा जालन्यातील अंतरवालीमध्ये उपोषणाला बसले आहेत. त्यांनी मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्यचा आरोप करत पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. कुणबी नोंदी आणि जातप्रमाणपत्र मिळवण्यासाठी होत असलेल्या अडचणींचा मुद्द्यावर कायमचा तोडगा निघणार नाही तोपर्यंत आपण आंदोलनातून माघार घेणार नाही, असं म्हटलं आहे. एवढच नाही तर आपण मुंबईतही दाखल होऊ, असंही म्हटलं आहे.
“उद्या दुपारी 12 वाजता अंतरवालीत होणाऱ्या बैठकीला सर्वांनी यावं. याच बैठकीमध्ये आपण मराठा बांधवांना मुंबईला जाण्याती तारीख आणि आंदोलनाचा मार्ग सांगितला जाईल, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्यासाठी आता उद्या मराठा समाजाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला सगळ्यांनी उपस्थित रहावं”, असं जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, जरांगे पाटलांच्या या भूमिकेवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूरमध्ये मारबत उत्सवामध्ये पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना म्हणाले की, “माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की छत्रपती शिवरायांना मानणारे जे जे आहेत, ते हिंदूंच्या सणांमध्ये किंवा गणपतीमध्ये विघ्न आणणार नाहीत. याशिवाय माझी कोणतीही प्रतिक्रिया नाही, ” असं सीएम म्हणाले आहेत.
तर एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाच्या विषयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, काल या विषयावर सविस्तर बैठक पार पडली आणि सकारात्मक चर्चा झाली आहे. पण काही लोकांना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राजकारण करायचे आहे. त्यामुळे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
