लाडक्या लेकीला मुंडावळ्या बांधणार, बाबा खूप खुशीत होता, पण लग्नाआधीच घडली हृदय पिळवटून टाकणारी घटना

| Updated on: Mar 29, 2023 | 2:41 PM

नवराईच्या रुपात नटलेल्या लेकीला पाहण्याचं स्वप्न या बापानंही रंगवलं होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं, अर्धापुरात घडलेली घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे.

लाडक्या लेकीला मुंडावळ्या बांधणार, बाबा खूप खुशीत होता, पण लग्नाआधीच घडली हृदय पिळवटून टाकणारी घटना
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राजीव गिरी, अर्धापूर ( जि. नांदेड ) : लाडक्या लेकीचं लग्न ठरलं होतं. तळहाताच्या फोडासारखं जपलेल्या लेकीला नवराईच्या रुपात पाहण्याचं बापाचं (Father) स्वप्न होतं. लेकीच्या लग्नाची धामधुमही घरात सुरु झाली होती. पण अचानक एक दुर्दैवी घटना घडली. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. घरात लगीन घाई सुरू असतांना एका दुर्दैवी घटनेत नवरीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे.

कुठे घडली घटना?

अर्धापूर शहरातील व्यंकटराव साखरे यांच्याकडे सालगडी म्हणून काम करणारे वाघजी सखाराम लिंगायत यांचा मंगळवारी या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. त्यांचं वय ४५ वर्षे होतं. अर्धापूर तालुक्यातून चोरंगा येथून वाघजी हे मंगळवारी सायंकाळी ८ वाजता दैनंदिन वस्तू खरेदीसाठी सायकलवर शहरात जात होते. अर्धापूर शहरातील कृषी कार्यालयासमोर असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडलं. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

कुटुंबावर शोककळा

वाघजी यांचा अपघात होताच महामार्ग, अर्धापूर पोलीस यांनी धाव घेतली व मयतांचे पार्थिव पुढील सोपस्कारासाठी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे पाठविण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. वाघजी लिंगायत यांची मुलगी नेहाच्या लग्नाची लगबग सुरू असतांना वधु पित्याचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

अर्धापूर शहरात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व शहरात अवजड वाहनास प्रवेश मनाई करण्यात आली आहे. पण बंदी असतानाही दररोज अशी अनेक अवडड वाहने शहरातून जातात. सर्वसामान्यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आजच्या या अपघातामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

खोदकामांनी त्रस्त

अर्धापूर शहरातील रस्त्याचे काम सुरू असून गुत्तेदार वाटेल तिथे खोदकाम करून वाहतुकीस व वाहन चालकांना अडथळा निर्माण करत आहेत. रस्ता उघडल्याने धुळ व चुरीमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि गाड्या घसरून पडत आहेत. संबंधितांनी लक्ष देऊन वाहतुकीस अडथळे येणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होतेय.