खासदार वसंत चव्हाण यांचं निधन; नांदेड जिल्ह्यावर शोककळा

Vasant Chavan Passed Away : नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 64 व्या वर्षी वसंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला. हैदराबादमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. वाचा...

खासदार वसंत चव्हाण यांचं निधन; नांदेड जिल्ह्यावर शोककळा
वसंत चव्हाण
Image Credit source: tv9
आयेशा सय्यद | Updated on: Aug 26, 2024 | 8:35 AM

ज्येष्ठ काँग्रेस नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 64 व्या वर्षी वसंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मागच्या काही दिवसांपासून वसंत चव्हाण आजारी होते. बीपी कमी झाला, त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आधी नांदेडच्या रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. पण त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला उपचारासाठी दाखल करण्यात आलं. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

वसंत चव्हाण यांचं निधन

वसंत चव्हाण यांची प्रकृती मागच्या काही दिवसांपासून खालावली होती. 13 ऑगस्टपासून हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. मात्र अचानक त्यांची तब्येत खालावली. त्यांची अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने नांदेड जिल्हा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.

नांदेडमधील अटीतटीची लढाई जिंकली

यंदाची लोकसभेची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची होती. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला. ते भाजपमध्ये गेले. त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या नांदेडमध्ये अटीतटीची लढाई झाली. अशा परिस्थिती 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली. तत्कालिन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेससाठी नांदेडमधील हा विजय महत्वपूर्ण होता.

अशोक चव्हाण यांच्याकडून श्रद्धांजली

राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजप नेते अशोक चव्हाण यांनी वसंत चव्हाण यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. वसंत चव्हाण यांचं असं अकाली जाणं आम्हा सगळ्यांसाठी धक्का आहे. अतिशय दु:खद घटना आहे. अचानक त्यांची तब्येत खालावली. पण ते उपचारांना प्रतिसाद देत होते. असं वाटत होतं की ते लवकरच बरे होतील. पण आज ही अत्यंत दु:खद बातमी समोर आली. आम्ही एकत्र काम केलेलं आहे. नांदेड जिल्ह्यासाठी आम्ही एकत्र काम केलं आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी कायम लढा दिला. त्यांच्या अकाली जाण्याने नांदेड जिल्ह्याचं नुकसान झालं आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

Follow Us