माझ्या पाठीशी अदृश्य शक्ती, महायुतीच्या उमेदवाराला पाडण्यासाठी… बंडखोर प्रसाद हिरेंच्या विधानाने मोठी खळबळ
नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजप नेते प्रसाद हिरे यांनी बंडखोरी करत शिंदे सेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्यावर कडाडून टीका केली आहे व आपण भाजपमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांमुळे वातावरण तापले आहे. तब्बल १७ जागांसाठी ही निवडणूक होत असून यात नाशिक मतदारसंघात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनीही अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे नाशिक विधानपरिषदेत नरेंद्र दराडे, गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे अशी तिहेरी लढत होणार आहे. आता याच पार्श्वभूमीवर भाजपाचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी एक मोठे विधान केले.
भाजपचे नेते प्रसाद हिरे यांनी आता अपक्ष उमेदवारी जाहीर का केली याबद्दल सविस्तर भाष्य केले आहे. त्यामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. मी आजही भाजपमध्येच आहे आणि उद्याही राहील. मी पक्षाविरुद्ध बंडखोरी केलेली नाही, तर शिंदे सेनेच्या अकार्यक्षम उमेदवाराचा पराभव करण्यासाठी आणि मतदारांमधील आक्रोशाला वाट करून देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे, अशी ठाम भूमिका प्रसाद हिरे यांनी घेतली आहे. मालेगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर कडक शब्दांत प्रहार केला.
कर्मवीर भाऊसाहेब हिरेंचा वारसा आणि नेतृत्वावर निष्ठा
प्रसाद हिरे यांनी गेल्यावर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी त्यांच्या राजकीय वारशाचा पुनरुच्चार केला. मला कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि बळीराम हिरे यांचा मोठा राजकीय व सामाजिक वारसा लाभला आहे. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर महाराष्ट्राचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर दृढ निष्ठा आहे. माझ्या पाठीशी अनेक दृश्य आणि अदृश्य शक्ती उभ्या आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी मला संपर्क साधण्याचा किंवा मी कोणाच्या सांगण्यावरून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, असे प्रसाद हिरे यांनी म्हटले.
शिंदे सेनेच्या उमेदवारावर कडाडून टीका
महायुतीमध्ये नाशिकची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटली असून, तिथून किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीवर प्रसाद हिरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. “शिंदे सेनेने दिलेल्या उमेदवाराबद्दल मतदारांमध्ये आणि शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विद्यमान उमेदवार दराडे हे अतिशय अकार्यक्षम, अप्पलपोटे, स्वार्थी आणि ढोंगी आहेत. अशा उमेदवाराचा पराभव झालाच पाहिजे, अशी भावना मतदारांची आहे. मतदारांमधील याच आक्रोशाला तोंड फोडण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे,” असा थेट हल्लाबोल हिरेंनी केला.
सर्वसामान्य जनता आणि शिक्षक मतदारांचा माझ्या चांगल्या वर्तणुकीवर आणि भविष्यातील कामगिरीवर पूर्ण विश्वास आहे. या निवडणुकीत मतदारांच्या भावनांचा आदर करत मी उतरलो आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करणे हाच माझा मुख्य उद्देश आहे. या निवडणुकीत मी फार मोठ्या मताधिक्याने आणि १०० टक्के यशस्वी होईल, असा मला विश्वास आहे, असेही प्रसाद हिरे म्हणाले.