
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिल ला अयोध्या ची वारी करत आहेत. याच दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या वारीची जबाबदारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर देण्यात आलेली आहे. याच दरम्यान नाशिक एक विशेष रेल्वे देखील आरक्षित करण्यात आली आहे. 13 हजाराहून अधिक शिवसैनिक आयोध्याची वारी करणार आहेत. मुख्यमंत्री यांच्या उपस्थित शरयू नदीच्या किनारी आरती देखील केली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी काही जबाबदाऱ्या दिल्या जात असतानाच नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी दिली जाणार आहे. अयोध्येच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना कोणतीही असो जबाबदारी मात्र नाशिकवरच असल्याचे दिसून येत आहे.
नाशिक मधून अयोध्येच्या दिशेने एक पदाधिकाऱ्यांचे पथक देखील रवाना झाले आहे. यामध्ये शिवसेनेचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, यांच्यासह प्रवक्ते नरेश मस्के, नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, नाशिक शहराचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, सुनील पाटील आणि अभय महादास यांचा त्या पथकात समावेश आहे.
खरंतर शिवसेना कोणतीही असो अयोध्येची जबाबदारी मात्र नाशिकवर असल्याचं पुन्हा एकदा दिसून आले आहे. शिवसेना एकसंघ असतांना उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा आयोध्या दौरा झाला होता. तेव्हाही नाशिककरांवरच जबाबदारी होती.
त्यापूर्वीही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा झाला होता. तेव्हाही जबाबदारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली होती. अयोध्या दौरा यशस्वी पार पाडल्यानंतर स्वतः ठाकरे कुटुंबाने नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले होते.
त्याचे कारण म्हणजे संजय राऊत यांच्यावर खरंतर ही जबाबदारी होती. त्यामध्ये संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख असल्याने त्यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना ही जबाबदारी दिली होती. त्यामुळे दोन्ही वेळेला हे नियोजन यशस्वीरित्या केले होते.
त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात हिंदुत्वाचा मुद्दा चर्चिला जात असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 एप्रिलला आयोध्या दौरा होत आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे या दौऱ्याची संपूर्ण जबाबदारी नाशिकच्याच पदाढीकऱ्यांवर आहे. त्याकरिता एक पथक आयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहे.
यावेळेला अयोध्येत राहण्याची, जेवणाची, दर्शनाची आणि आरतीचीचे नियोजन नाशिकचे पदाधिकारी करणार आहे. त्याकरिता शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी रेल्वे रवाना झाले आहे. तर खास रेल्वेही आरक्षित करण्यात आली असून ती देखील आधीच्या दिवशी अयोध्येत दाखल होणार आहे.