Nashik Rain : उद्या आठवडे बाजार बंद, नाशिकसाठी लष्कर अलर्ट मोडवर; 5 तालुक्यांमध्ये हाय टेन्शन
भारतीय हवामान खात्याने (IMD) नाशिकमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, दिंडोरीसह ग्रामीण भागात अतिवृष्टी होऊ शकते.

Nashik Rain Update : सध्या मुंबई, कोणक, पुणे, नाशिक या भागात तुफान पाऊस सुरू आहे. मुंबईत तर जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात ढगफुटी होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन नाशिक जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. ढगफुटी झालीच तर बचावकार्य करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. तसेच खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाची तयारी काय आहे, याबाबत सविस्तर सांगितले. तसेच नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
5 तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी
भारतीय हवामान खात्याने (IMD) नाशिकमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, दिंडोरीसह ग्रामीण भागात अतिवृष्टी होऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी या 5 तालुक्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच या भागातील आठवडे बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत. तशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
सप्तशृंगी मंदिरही उद्या बंद राहणार
तसेच, शेतकऱ्यांनी उद्या शेतात जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान उद्या बंद ठेवण्यात येणार आहे. सप्तशृंगी परिसरातही अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सप्तशृंगी मंदिरही उद्या बंद राहणार आहे. पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी प्रशासनाच्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. JCB, Poclain आणि इतर यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. गरज भासल्यास मदतीसाठी लष्करालाही सतर्क करण्यात आले आहे.
आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे
दरम्यान, नाशिकमधील संभाव्य ढगफुटी लक्षात घेता तेथील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच फारच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.