UPSC परीक्षेला विद्यार्थ्यांना जाण्यास उशीर, नाशिकमधील खड्ड्यांचा फटका विद्यार्थ्यांना, परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ
खड्ड्यांमुळे UPSC परीक्षेला विद्यार्थ्यांना जाण्यास उशीर झाला, त्यामुळे त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला. यावरून परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ झाला.

नाशिकमधील खड्ड्यांचा फटका आता विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. नाशिकमधील खड्ड्यांमुळे UPSC विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला. अवघ्या दोन मिनिटांचा उशीर झाल्याने त्यांचा परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला. शहरातील खड्ड्यांमुळे केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला.
नेमकं काय घडलं?
UPSC परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास 2 मिनिटे उशीर झाला. त्यामुळे त्यांना केंदावर प्रवेश नाकारण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी विनंती केली.परंतु त्यांना प्रवेश दिला नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. त्यात गुगल मॅपवर केंद्रावर पोहोचण्यासाठी चुकीचे रस्ते दाखवण्यात आले,असे कारण विद्यार्थ्यांनी दिले. त्यात इतर परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात आहे. परंतु एकाच केंद्रावर अडवणूक होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र विनंती केल्यानंतरही प्रवेश देण्यात आला नाही.
तत्पूर्वी, नाशिकमध्ये खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांत खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. खड्ड्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुबीयांना आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. या खड्ड्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. या प्रश्नावरून विरोधकांनी जोरदार आंदोलन देखील केलं. त्यानंतरही खड्ड्यांचा प्रश्न मिटला नसल्याचे समोर येत आहे.
काय आहे नियम?
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जाणाऱ्या उमेदवारांना जाण्यास थोडाही उशीर झाल्यास त्यांना प्रवेश नाकारला जातो. याबाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अंत्यंत कडक नियम आहेत. तसेच प्रवेशाबाबतचे हे नियमच अंतिम आहेत. दरवर्षी अनेक परीक्षा केंद्रावर 1 ते 5 मिनिटांचा उशीर झाल्यास उमेदवारांना बसू दिले जात नाही. यामुळे उमेदवाराचे संपूर्ण वर्ष वाया जाते. खरंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियमानुसार, परीक्षा सुरू होण्याआधी सुरक्षा तपासणी आणि बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे गेट बंद करण्याची वेळी काटेकोरपणे पाळली जाते. याच कडक नियमाचा फटका नाशिकमधील विद्यार्थ्यांना बसला.