कलिंगडानंतर आता मटणाची दहशत! रात्री मटण खाताच पत्नीचा मृत्यू, नवऱ्याची प्रकृती चिंताजनक; नाशिक हादरलं
काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधेच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता मटणामुळे विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. आता नेमकं काय घडलं आहे?

काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जाणांचा मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांमध्ये कलिंगड खाण्याबाबत दहशत निर्माण झाली होती. त्यापाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे मटण खाल्ल्यानंतर विषबाधेची घटना घडली आहे. रात्री मटण खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात दही खाल्ल्याने शेतकरी दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. यात पत्नीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून, नवरा गंभीर स्थितीत आहे.
द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर शांताराम ह्याळीज (वय ६०) यांच्यावर मालेगाव येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
रात्री दाम्पत्याने मटणाचे जेवण केले. त्यानंतर काही वेळाने त्यांनी दही खाल्ले. थोड्याच वेळात दोघांची प्रकृती बिघडू लागली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना नामपूर ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच द्वारकाबाई यांचा मृत्यू झाला. शांताराम यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
पोलिस तपास
बागलाण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. नेमकी विषबाधा मटणामुळे की दह्यामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भातील आवश्यक नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच खरी कारणे समोर येणार आहेत. ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधेच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता मटणामुळे ही घटना घडल्याने नाशिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.