शरद पवार यांना सोडण्यासाठी दोन बड्या नेत्यांच्या ऑफर्स; एकनाथ खडसे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Sep 25, 2023 | 12:50 PM

भाजपचे नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्यास अतूर झाल्याचा दावा महाजन यांनी केला होता. त्यावर नाथाभाऊंनी पलटवार केला आहे.

शरद पवार यांना सोडण्यासाठी दोन बड्या नेत्यांच्या ऑफर्स; एकनाथ खडसे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
eknath khadse
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव | 25 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांना घट्ट पकडून राहावं. भाजपकडे येण्यासाठी हातपाय जोडू नये, असं मोठं विधान भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केलं होतं. गिरीश महाजन यांच्या या विधानावर एकनाथ खडसे यांनी पलटवार केला आहे. आपण भाजपकडे येण्याचा प्रयत्नच करत नाही. उलट भाजपकडूनच आपल्याला बोलावणं आहे, असा गौप्यस्फोट करतानाच शरद पवार यांनना सोडण्यासाठी अजितदादा गटाच्या दोन बड्या नेत्यांनीही आपल्याला फोन केले होते, असा खळबळजनक दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. नाथाभाऊ यांनी थेट बॉम्बच टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. मी शरद पवारांचा पक्का शिलेदार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. मला अजित पवारांनी त्यांच्यासोबत जाण्याबाबत विचारलं होतं. तसेच शरद पवार यांना सोडून अजितदादा गटात येण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांचाही मला फोन आला होता, असा गौप्यस्फोट करतानाच मला या दोन्ही नेत्यांनी बोलावलं होतं. पण मी शरद पवार यांचा पक्का शिलेदार आहे. कोणत्याही परिस्थिती शरद पवार यांची साथ सोडणार नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

तर त्यांच्याकडे कसा जाणार?

राष्ट्रवादीत जायला आणि भाजपमध्ये जायला मी उतावीळ आहे, असं महाजन म्हणतात. मी कधी त्यांच्याकडे आलो हे अजितदादांनी जाहीर करावं. उलट अजितदादांनीच मला विचारणा केली. मिटकरींनी फोन केला. एवढंच कशाला भाजपवालेही मला भाजपमध्ये येण्याचा आग्रह करतात. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उघड बोलावलं तरीही मी त्यांच्याकडे गेलो नाही. मी भाजपकडे गेलो नाही तर अजित पवारांकडे कसं जाणार? असा सवालच त्यांनी केला.

मी हांजीहांजी करणारा नाही

मी सत्तेसाठी कोणाचाही हांजीहांजी करणारा माणूस नाही. मी कोणाच्याही मागे उभा राहून फोटो काढणारा माणूस नाही. मीच संकट मोचक, मीच संकट मोचक आहे असं सांगून पुढे पुढे करणारा माणूस मी नाही. स्वाभिमानाने जगलो. स्वाभिमानाने जगेल. सत्तेत जायचं असलं तर कधीच गेलो असतो, असं म्हणत नाथाभाऊंनी गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता टीका केली.

फोटोसाठी धडपडत नाही

सर्व काही मलाच हवं असतं तर मी गिरीश महाजन यांना पुढं आणलं नसतं. त्यांना केव्हाच मागे सारलं असतं. पण माझ्या तत्त्वात बसत नाही. तुम्हाला माहीतच आहे, मी कुणाच्याही पाठी फिरत नाही. फोटोसाठी धडपडत नाही. मला तशी गरजही नाही, असा हल्लाबोलच त्यांनी केला.