नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावं लागेल? विजय वडेट्टीवर यांचे नेमके संकेत काय?

नाना पटोले यांनी आज महत्त्वाचं वक्तव्य केलं. "माझं कुणीही काही वाकडं करु शकणार नाही. मी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत प्रदेशाध्यक्ष असणार", असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.

नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावं लागेल? विजय वडेट्टीवर यांचे नेमके संकेत काय?
vijay wadettiwar and nana patole
| Edited By: | Updated on: May 29, 2023 | 7:25 PM

नाशिक : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फेरबदल होणार असल्याच्या चर्चांवर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मीच प्रदेशाध्यक्ष असणार. माझं कुणीही वाकडं करु शकणार नाही, असं नाना पटोले स्पष्ट म्हणाले. नाना पटोले यांच्यावर पक्षातीलच एक मोठा गट नाराज असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातील शाब्दिक चकमक बघायला मिळाली होती. एकाच पक्षातील दोन दिग्गज नेते एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करताना दिसली. त्यानंतर आता पुन्हा दोन्ही नेत्यांमध्ये टोले-टोमणे बघायला मिळत आहेत.

“नाना भाऊ काय म्हणाले, मी ऐकलं नाही. ते अध्यक्ष राहिले तर त्यांच्या नेतृत्वात लढू. पक्ष नेतृत्वाने दिला तर दुसऱ्या अध्यक्षांच्या नेतृत्वात लढवू. आज नाना आमचे नेते, उद्या दुसरे कोणी आले तर ते आमचे नेते. हायकमांडच्या मनात काय हे जाणवायला मी मनकवडा नाही. हायकमांड आणि नानांची भेट झाली असेल”, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

विजय वडेट्टीवार यांचा मविआ नेत्यांना मोलाचा सल्ला

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. “मेरिटवरच निवडणूका झाल्या पाहिजेत. सगळ्यांनी बसून मेरिटचा निर्णय घ्यावा. बाय इलेक्शनवर वाद करण्याची गरज नाही. कसब्याची निवडणूक आम्ही लढवली, आम्हाला यश मिळालं. लोकसभेच्या दृष्टीने वाद होतील असं काहीही होता कामा नये. सगळ्यांनी सामंजस्याने घ्यावं”, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी दिला.

“अजून मंडप सजलेला नाही, काम कोणी करायचं, हा विषय कशाला काढता? मीडिया समोर चर्चा नको. तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बैठकीत निर्णय घेतील. राज्यातील भ्रष्टाचारावर चर्चा होत नाही. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले ते योग्य आहे. जो पर्यंत अंतिम निर्णय होत नाही तो पर्यंत ट्विट किंवा माध्यमांशी बोलू नका”, असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं.

“महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलायचे तर फोनवर बोलावे”, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी दिला. “सत्ताधारी असलेल्या पक्षांमध्येही धुसफूस आहेच. 22 पैकी 9 जागा भाजप मागते आहे. लावा टिळा”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

“अजित पवार यांची काही आग्रही भूमिका नाही. काँग्रेसची जागा आहे, तिन्ही पक्ष एकत्र लढले आणि काँग्रेस निवडून येईल. आम्ही जोपर्यंत 48 मतदारसंघातील परिस्थिती समजून घेत नाही, तोपर्यंत परिस्थितीत कशी कळेल?”, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.

Follow Us