निकाल असाच लागेल ही धमकी आहे का? तुम्ही त्यात पडू नका; संजय राऊत यांचा फडणवीस यांना इशारा
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबतच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. 'हाच निकाल लागेल' हे विधान म्हणजे धमकी असून, न्यायव्यवस्थेत ढवळाढवळ करू नका, असा इशारा राऊत यांनी दिला. जनतेचे न्यायालय म्हणजे भ्रष्ट न्यायालय असल्याचा आरोप करत, फडणवीस यांनी न्यायाधीशांना भेटून धमक्या दिल्या का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निकाल जनतेच्या न्यायालयात लागलेला आहे. असाच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल असं सांगता ही काय धमकी आहे का? तुम्ही काय सुप्रीम कोर्टातील न्यायामूर्तींना भेटून आला का? या धमक्या देऊ नका. तुम्ही त्यात पडू नका. तुटेपर्यंत ताणू नका, असा इशाराच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेवर सुरू असलेल्या सुनावणीवर भाष्य केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेच्या न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निकाल लागला आहे. त्यामुळे हाच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल असा आम्हाला विश्वास आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. या संदर्भात संजय राऊत यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
ते भ्रष्ट न्यायालय
फडणवीस जनतेचं न्यायालय कुणाला म्हणत आहे? ज्या जनतेच्या न्यायालयात फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी 1500-1500 रुपयाला मते विकत घेतली. आणि अत्यंत बोगस लोकांना त्या योजनेचा लाभ दिला. महिलांच्या योजनेचा लाभ पुरुषांना आणि अपात्र लोकांनाही मिळवून दिला आणि विजय मिळवला. ते भ्रष्ट न्यायालय आहे. अशा भ्रष्ट न्यायालयाला तुम्ही जनतेचं न्यायालय म्हणत असाल तर लोकशाहीवर संकट आणत आहात. सर्वोच्च न्यायालयात हाच निकाल लागेल ही धमकी आहे का? असा सवाल राऊत यांनी केला.
कोर्टाच्या रेकॉर्डवर आणू
एका बाजूला मोदी फुटीर खासदारांना म्हणतात मी तुमच्या पाठिशी आहे. दुसऱ्या बाजूला फडणवीस म्हणतात आमच्या बाजूने निकाल लागेल. तुम्ही न्यायामूर्तींना भेटून आला का? त्यांना काय धमक्या दिल्या का? जनतेला कळू द्या. देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे. देशाला संविधान लोकशाही आहे. नेहरूंच्या काळापासून संविधानिक संस्था निष्पक्ष काम करत होत्या. तुम्ही त्याला भ्रष्ट केल्या आहेत. हे चालणार नाही. लोक जागे झाले आहेत. फडणवीस तुमच्यावर संकट ओढवून घेऊ नका. इतर गद्दारांच्या टोळ्यांचं काय करायचं ते आम्ही पाहू. तुम्ही त्यात पडू नका. तुमचं काम नाही. ओढून ताणून काही केलं तर ताणेपर्यंत तुटू नका. धमक्या देऊ नका. न्यायालयाला काम करू द्या, असं सांगतानाच हाच निकाल लागेल अशी तुम्ही धमकी दिली आहे. आम्ही हे कोर्टाच्या रेकॉर्डवर आणणार आहोत, असं राऊत म्हणाले.
मग राजीनामा द्या
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लायक नसलेले गृहमंत्री म्हटलं आहे. त्यांच्या संसदेतील उपस्थितीवरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यावरही राऊतांनी भाष्य करत चव्हाणांशी सहमती दर्शवली. पृथ्वीराज चव्हाण काय चुकीचं बोलले? आम्ही तेच सांगतो. माणसाला महत्त्वकांक्षा असल्या पाहिजे. पण लायकी असावी. लायकी नसेल आणि पदावर असेल तर त्या पदावर बसलेली व्यक्ती देशाच्या लोकशाहीचं नुकसान करते. अमित शाह नुकसान करत आहेत. त्यांनी मोदींकडे उपपंतप्रधान करण्याची मागणी केली आहे. मोदींनी त्याला नकार दिला. तुम्ही सभागृहात येत नाही. विरोधक येऊ देत नाही म्हणता मग राजीनामा द्या, असं त्यांनी सांगितलं.
