VIDEO : मंदिर, घरे पाण्याखाली… गोदावरीला धडकी भरवणारा पूर, नाशिककरांची दाणादाण; पुढचे चार दिवस…

गेल्या तीन दिवसापासून बागलाणच्या पश्चिमपट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हरणबारी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. सोडलेल्या पावसाने सटाणा तालुक्यातील आंबासनसह इतर गावांना जोडणाऱ्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे.

VIDEO : मंदिर, घरे पाण्याखाली... गोदावरीला धडकी भरवणारा पूर, नाशिककरांची दाणादाण; पुढचे चार दिवस...
Godavari River
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 09, 2023 | 1:05 PM

चैतन्य गायकवाड, मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 9 सप्टेंबर 2023 : गेल्या महिना दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने गोकुळाष्टमीपासून जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत. एवढेच नव्हे तर गोदावरी नदीलाही पूर आल्याने गोदाकाठ परिसरातील नागरिकांची दाणादाण उडाली आहे. या धडकी भरवणाऱ्या पुरामुळे या परिसरातील मंदिर, घरे, शेतशिवार पाण्याखाली गेल्याने नाशिककरांची दाणादाण उडाली आहे. मात्र, या पावसामुळे नाशिककरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पुढच्या चार दिवसात जिल्ह्यात मध्यम पाऊस कोसळण्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच असून गोदावरीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आला आहे. गंगापूर धरणातून 9000 क्यूसेस एवढ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नाशिकमधील पुराचं मापक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत सध्या पुराचे पाणी असल्याचं बघायला मिळत आहे. या परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली गेले आहेत. अनेक घरात पाणी शिरलं आहे. तसेच शेतीमध्येही पाणी भरल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. दरम्यान हवामान खात्याने पुढचे चार दिवस नाशिकला मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला असून प्रशासनासह गोदा घाटच्या नागरिकाना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

नाशिक शहरात सकाळपासून पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर आलाय. रामुकंड परिसरातील छोटी छोटी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तब्बल तीन महिन्यांनी गोदावरी नदी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागलीय.

गंगापूर धरणातून सोडलेले पाणी आणि नदी परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. सकाळी 8.30 वाजेपासून ते दुपारी 2.20 वाजेपर्यंत नाशिक शहरात 55 मिमी पावसाची नोंद झाली. तर दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.

50 हजार क्युसेक पाणी सोडलं

दोन दिवसापासून सुरू आलेल्या पावसामुळे धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. चाणकापूर आणि पुनद धरणातून गिरणा धरणात 50 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. गिरणा नदी पात्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गिरणा धरणात पाणी पातळीत वाढ होणार असून मालेगाव सह जळगाव जिल्हयाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. परंतु मालेगावसह परिसरात पाहिजे तितका पाऊस न झाल्याने शेतपिकांसाठी लागणारा पाणी प्रश्न कायम आहे.