“भर अंधारातदेखील मोर्चा सुरू”;किसान सभेला अजूनही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे निमंत्रण नाही…

| Updated on: Mar 14, 2023 | 8:44 PM

किसान सभेने आता थेट इशारा दिला आहे. त्यामुळे किसान सभेने आता कितीही अंधार झाला, पाऊस आला तरी मोर्चा सुरूच राहणार असल्याचा निर्धार करण्यात आला आहे.

भर अंधारातदेखील मोर्चा सुरू;किसान सभेला अजूनही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे निमंत्रण नाही...
Follow us on

इगतपुरी/नाशिक : कष्टकरी, शेतकरी आणि आदिवासी लोकांचा आपल्या विविध मागण्यांसाठी लाँग मार्च आज तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे.सध्या इगतपुरी येथील खंबाळे या गावामध्ये लाँग मार्च आला असून सरकारकडूनही अजून कोणताचा निर्णय आला नसल्याने किसान सभेने आता आम्ही आमच्या मोर्चावर ठाम असल्याचे सांगत कष्टकरी, शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या मागण्या मान्य झाल्यापासून आम्ही मागे हटणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे किसान सभेचं लाल वादळ मुंबईत आल्यानंतर सरकारकडून नेमकं आंदोलनकर्त्यांना कोण भेटणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

किसान सभेच्या लाल वादळ नाशिकच्या दिंडोरी या ठिकाणाहून मुंबईकडे रवाना झाले होते. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी कष्टकरी शेतकरी सहभागी झाले आहेत.

शेतीमालाला हमीभाव देण्याच्या मागणीसह अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, वन जमिनी नावावर करा अशा प्रकारच्या मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात आला आहे.

या लाँग मार्चवेळी दिंडोरीजवळ आंदोलन काही प्रमाणात आक्रमक झाले होते. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर कांदा फेकून कांद्याला भाव मिळत नसल्याच्या कारणावरून सरकारचा निषेध व्यक्त केला होता.

नाशिकहून निघालेल्या किसान सभेच्या लाल वादळ मुंबईत येऊन धडकणार असले तरी सरकारकडून अजूनही कोणताही निर्णय कळवण्यात आला नाही.

त्यामुळे किसान सभेने आता थेट इशारा दिला आहे. त्यामुळे किसान सभेने आता कितीही अंधार झाला, पाऊस आला तरी मोर्चा सुरूच राहणार असल्याचा निर्धार करण्यात आला आहे.

लाल वादळ मुंबईत धडकणार असून उद्याच्या मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीचे अद्याप अधिकृत कोणतेही निमंत्रण आले नसल्याचेही डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले आहे. सरकारकडून कोणतेही निमंत्रण आले नाही.