चर्चा तर होणारचः सनसनाटी पत्रफुटीची नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून चौकशी सुरू

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या पत्रावरून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय. तसेच या प्रकरणी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करू, असा इशारा दिलाय. त्यांनी या प्रकरणावरून पोलीस विभागाचेही वाभाडे काढलेत. पोलीस विभागाने राज्यात आतापर्यंत काय-काय दिवे लावले याचा पाढाही वाचलाय.

चर्चा तर होणारचः सनसनाटी पत्रफुटीची नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून चौकशी सुरू
दीपक पांडेय, पोलीस आयुक्त, नाशिक.
मनोज कुलकर्णी | Updated on: Apr 07, 2022 | 5:19 PM

नाशिकः महसूल विभागाविरोधात सनसनाटी पत्र लिहून शड्डू ठोकत थेट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची नाराजी ओढावून घेणारे नाशिकचे (Nashik) पोलीस आयुक्त (Police Commissioner) दीपक पांडेय यांनी अखेर या प्रकरणाची चौकशी सुरू केलीय. हे पत्र फुटलेच कसे, याचा तपास आता करण्यात येत आहे. पोलिसांच्या विशेष शाखेकडे या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली आहे. या चौकशीच्या अहवालावर पोलीस आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेय. पोलीस आयुक्त पांडेय यांनी पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या पत्राने राज्यात पेटलेल्या राजकारणात काडी टाकलीय. त्यामुळे नाहकच पोलीस विरुद्ध महसूल विभाग एकमेकांसमोर उभे टाकलेत. पोलीस आयुक्तांनी आपल्या पत्रात काही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्याची भाषाही अतिशय प्रशोभक आहे. त्यात ते म्हणतात की, महसूल अधिकारी (Revenue Officer) ‘आरडीएक्स’, तर दंडाधिकारी डिटोनेटर बनत आहेत. त्यामुळे जिवंत बॉम्ब तयार होत आहेत. जिल्ह्यात भूमाफियांनी सर्वसामान्यांची अक्षरशः लूट सुरू केलीय. महसूल अधिकारी त्यांच्या बाजूने आहेत. या भूमाफियांपासून नागरिकांना अभय मिळावे म्हणून महसूल दंडाधिकारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकार आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे अधिकार पोलीस आयुक्तांकडे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केलीय.

मुख्यमंत्र्यांपर्यंत विषय पोहचणार

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या पत्रावरून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय. तसेच या प्रकरणी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करू, असा इशारा दिलाय. त्यांनी या प्रकरणावरून पोलीस विभागाचेही वाभाडे काढलेत. पोलीस विभागाने राज्यात आतापर्यंत काय-काय दिवे लावले याचा पाढाही वाचलाय. सध्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह जामिनावर आहेत. एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे तुरुंगात आहेत. पुण्यात पोलिसांनी व्यापाऱ्यांचे अपहरण करून खंडणी मागितलीय. बीटकॉईन घोटाळ्यात पोलीस अधिकारी सहभागी आहेत. पोलिसांनी आधी आपल्या विभागाकडे लक्ष द्यावे. वाळू, रेशनधान्य, भेसळयुक्त अन्नपदार्थ, परमीट रूम, हातभट्टीची दारू याचे काय होते, हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, अशा शब्दांत महसूल मंत्र्यांनी ताशेरे ओढलेत.

खरंच आत्मपरीक्षण केले?

पोलीस आयुक्त पांडेय यांनी नाराज महसूल मंत्र्यांची सपशेल माफी मागितली आहे. थोरात सुजाण आणि चांगले मंत्री आहेत. त्यांना पत्रातील भाषा चुकीची वाटत असेल, तर मी माफी मागतो. या पत्रातून कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. फक्त दोनशे वर्षांपासून सुरू असलेल्या त्रुटी दूर करण्याचा हेतू आहे. मी महसूल विभागाच्या विरोधात नाही. या विभागाचे राज्याच्या विकासात मोठे योगदान आहे, असे मत व्यक्त केले. मात्र, ते अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. तेव्हा पोलीस आयुक्तांनी खरेच पोलीस विभागाचे आत्मपरीक्षण केले का, असा सवाल महसूल संघटना विचारत आहेत. त्यांनी पांडेय यांच्यावर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिलाय.
इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us