…तर आम्ही गपचूप बसणार नाहीत, भविष्यात शब्द जपून वापरा, नाशिकमध्ये भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांचा राणेंना इशारा

| Updated on: Aug 30, 2021 | 5:35 PM

नाशिक पोलिसांनी भाजप कार्यलयावर दगडफेक करणारे शिवसैनिक दीपक दातीर, बाळा दराडे यांना ताब्यात घेतलं होतं. या कार्यकर्त्यांचा जामीन मंजूर झाला आहे.

...तर आम्ही गपचूप बसणार नाहीत, भविष्यात शब्द जपून वापरा, नाशिकमध्ये भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांचा राणेंना इशारा
Nashik Shiv Sena
Follow us on

नाशिक : केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा वाद उफाळला होता. नाशिकमध्ये तर काही शिवसैनिकांनी थेट भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. नाशिक पोलिसांनी भाजप कार्यलयावर दगडफेक करणारे शिवसैनिक दीपक दातीर, बाळा दराडे यांना ताब्यात घेतलं होतं. या कार्यकर्त्यांचा जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे त्यांची आज पोलीस ठाण्यातून सुटका झाली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजप आणि नारायण राणे यांना पुन्हा एकदा इशारा दिला.

शिवसैनिक नेमकं काय म्हणाले?

“भाजपती नितीमुल्य आताच्या काळात बदलली आहेत. पक्षात जी नवी माणसं आली आहेत ती चुकीची वक्तव्य करतात. त्यामुळे हा वाद भाजपने स्वत:हून ओढून घेतला आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुणी आक्षेपार्ह वक्तव्य केलं तर काय करावं ते शिवसैनिकाला सांगण्याची गरज नसते. आमच्या कुटुंब प्रमुखाबद्दल असे शब्द वापल्यास आम्ही गपचूप बसणार नाहीत. आता भविष्य काळात त्यांनी जपून शब्द वापरावे. आमच्या दैवताबद्दल जर कुणी असं बोललं तर शिवसैनिकांची माथी फिरतीलच”, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी जामीन मंजूर झाल्यानंतर दिली.

नेमकं काय घडलं होतं?

24 ऑगस्ट रोजी शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयाला लक्ष्य केलं होतं. जुन्या नाशिकमध्ये भाजपचं वसंत स्मृती हे अलिशान कार्यालय आहे. शिवसैनिक गाडीत बसून आले आणि त्यांनी भाजपच्या कार्यालयावर प्रचंड दगडफेक केली होती. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोनाच्या काळात सावरले. त्यांनी महाराष्ट्र वाचवला. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिलं जाईल. ही तर सुरुवात आहे, असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी राणे यांना दिला होता.

राणे नेमंक काय म्हणाले होते?

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

 

संंबंधित बातम्या:

भावजयी शेतात शौचास गेली म्हणून दीर भडकला, आधी शिवीगाळ, नंतर भावासोबत हाणामारी, मरेपर्यंत मारलं

VIDEO: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना निर्बंधातून सूट नाही; राजेश टोपे यांचं मोठं विधान

आम्ही राणेंचे कार्यकर्ते नाही, राज ठाकरेंचे सैनिक आहोत, मनसे नेते अविनाश जाधवांनी ललकारले