नाशिकः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा ड्रीम प्रोजक्ट म्हणून ओळखल्या जाणारा आणि गेल्या सहा वर्षांपासून नसत्या उठाठेवी करून शहरवासीयांना वेठीस धरणारा स्मार्ट सिटी प्रकल्प (Smart City) आता नाशिकमधून (Nashik) गाशा गुंडाळणार आहे. येत्या 31 मार्चनंतर एकही नवी निविदा काढू नये, असे आदेश आलेत. त्यामुळे या भपकेबाज प्रकल्पासून सुटलो, अशीच भावना सर्वसामान्य नाशिककर व्यक्त करतायत. गेल्या काही महिन्यांपासून रामसेतू, रामकुंड पाडण्याच्या हालचाली ते गोदातीरावरील अनेक मंदिरे उद्धवस्त करण्याचे काम या प्रकल्पात असणाऱ्या रथी-महारथींनी केले. त्यातही गेल्या अडीच वर्षांत शहरात फक्त एक रस्ता केला. तो स्मार्ट म्हणायचा का, असा प्रश्न नागरिकांना पडतो. नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाबद्दलही अनेकांनी सवाल उपस्थित केले. शेवटी-शेवटी तर नाशिककरांनी या प्रकल्पाविरोधात शड्डू ठोकून रस्त्यावर लढाई सुरू केली. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या वादग्रस्त कामाची पाहणी करून काही सूचना दिल्या होत्या. आता हा प्रकल्प गाशा गुंडाळणार असल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय, असेच म्हणावे लागेल.
स्मार्ट सिटी प्रकल्पात नाशिकची दुसऱ्यांदा निवड झाली होती. त्यात बाराशे कोटी रुपयांची कामे केली जाणार होती. सहा वर्षांत 24 कामे सिद्धी नेण्याचा निर्धार करण्यात आला. मात्र, सध्या यातील फक्त आठ कामे झालीयत. त्यात साडेआठशे कोटी रुपयांची इतर कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे या प्रक्लपातील प्रत्येक काम वादग्रस्त ठरत गेले.
नाशिकमध्ये स्मार्ट सिटीला त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ दरम्यान फक्त एक किलोमीटरचा रस्ताही चांगला बनवता आला नाही. यावर तब्बल सतरा कोटी रुपये खर्च झाले. अतिशय सुमार दर्जामुळे हे काम वादग्रस्त राहिले. कालिदास कलामंदिराचे कामही वादात राहिले. सध्या महात्मा फुले कलादालन, नेहरू उद्यान, दोन विद्युत दाहिनी, गोदावरीतील पानवेली काढण्यासाठी मशीन, मेकॅनिकल गेट ही कामे करण्यात आली आहेत.
स्मार्ट सिटी प्रकल्पात गावठाण विकास आहे. मात्र, त्यासाठी गावठाण खोदून ठेवल्याने गाव बंद राहिले. हे कामही वादात अडकले. आता स्काडा मीटर, गावठाणात चोवीस तास पाणी, पंडित पुलस्कर सभागृहाचे नूतनीनकरण, जलशुद्धीकरण प्रकल्प, गोदा प्रोजक्टचे तीन टप्पे अशी कामे सुरू आहेत. मात्र, ती होणार कधी असा प्रश्न पडला आहे.