Raj Thackeray: … मग विद्यार्थ्यांनी चिडायचं नाही का? शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवत राज ठाकरे यांचा थेट सवाल
Raj Thackeray on Education System: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर जोरदार टीका केली. चीनमधील परीक्षा पद्धतीचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांनी राग व्यक्त केला तर चुकले कुठे असा सवाल केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल केला. चीनमधील परीक्षा पद्धतीचे उदाहरण देत त्यांनी यंत्रणेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. जंतर मंतरवर आंदोलन सुरू असतानाही पेपर फुटले याकडे त्यांनी लक्ष वेधले. तर माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी परदेशात शिकते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
भाजपमधील अंतर्गत भांडण यानिमित्ताने बाहेर आले
शिक्षणातील या गोष्टी आहेत, बऱ्याच वर्षानंतर असं आंदोलन झालं. प्रत्येक आईवडिलांचा मुलगा नीटला नव्हता. सर्वच विद्यार्थी नीटचे नव्हते. पण तरुणांच्या मनातील राग होता. सभोवतालचा राग होता. या पुढे अजून जोरात येईल. जंतरमंतरवरचं आंदोलन ही सुरुवात आहे. पण सरकारबद्दलचा राग अशा प्रकारचा बाहेर येतो. आंदोलन घराघरात शिरलं. तरुणांना मारलं. माझ्या मुलाला मारलं प्रत्येक आईवडिलांना वाटलं. शांततेत आंदोलन सुरू होतं. सरकारने या सर्व गोष्टींची सुरुवात केली. भाजपमधील अंतर्गत भांडण आहे. त्या गोष्टी चव्हाट्यावर येतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
ही अशी भिक्कार शिक्षण पद्धती
मुलं आठ आठ तास क्लासमध्ये बसत आहे. मग कॉलेज काय करतंय. कोचिंग क्लास सर्वच वाईट आहे असं नाही. पण आता धंदा म्हणून जे आले, नीट पेपरही कोंचिंग क्लासवाल्यांनीच फोडले. आतापर्यंतचे पेपर कोचिंग क्लासवाल्यांनीच फोडले ना. नीलकनींनी पहिल्यांदा क्लासवर लक्ष दिलं पाहिजे. क्लास ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलसेजला जायचं. चंद्रकांत पाटील, सीएमने यावर लक्ष दिलं पाहिजे. कॉलेजची फी २० हजार रुपये. क्लासची फी लाख रुपये. क्लासमध्ये अटेंडन्स लावल्यावर कॉलेजला अटेन्डन्स कसा लागतो. ही अशी भिक्कार शिक्षण पद्धती आहे. कॉलेजवाल्याला पैसे मिळाले असणार, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
मग विद्यार्थ्यांनी चिडू नये का?
२१ मुलांनी आत्महत्या केली. त्यात यश गोसावीचं नाव आहे. पालकमंत्री आहेत नाही माहीत नाही. नाशिकचा मुलगा नीटची तयारी करतो. पेपपर फुटल्यावर आत्महत्या करतो. २१ मुलांची नावे येतात. २२ वं नाव देता येत नाही? हे कोणतं सरकार सुरू आहे? काय चालू आहे? आपल्या देशातील विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहे. त्यांच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. दरवर्षी आंदोलन होत आहे. या शिक्षण पद्धतीला गांभीर्याने घेत नसाल आणि विद्यार्थ्यांनी चिडू नये असं म्हणत असाल, तर कसे चालेल असा सवाल राज ठाकरे यांनी केला.