नाशिक : इगतपुरीतील जुना कसारा घाट गेल्या 2 तासापासून बंद आहे. या घाटात दोन वाहने बंद पडली. तसंच एक कंटेनर रस्त्यात आडवा झाला. यामुळं जुना कसारा घाटातील (Kasara Ghat) वाहतूक बंद झाली. मुंबई-नाशिक (Mumbai-Nashik) महामार्गाची जुन्या घाटातील वाहतूक नव्या घाटातून वळवण्यात आली. गेल्या दोन तासांपासून वाहतूक पोलीस भर पावसात बंद पडलेली वाहने व कंटेनर (Container) बाजूला करण्याच्या प्रयत्नात आहेत. खाजगी क्रेन मागवून वाहने बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी भागात काल रात्रीपासून धो-धो पाऊस पडत आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं. भावली, तळेगाव, खालची पेठसह घोटीमध्ये चांगलाच पाऊस पडला.
कसारा घाटात दोन वाहनं बंद पडल्यामुळं वाहतूक ठप्प झाली. त्यामुळं जुन्या घाटातील वाहतूक नव्या घाटातून वळविण्यात आली आहे. याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहेत. रात्रीची वेळ असल्यानं वाहतूक सुरळीत करण्यात अडचण येत आहे. वाहनं उचलून क्रेननं ते बाजूला ठेवावी लागणार आहेत. त्यानंतरच वाहतूक सुरळीत होईल. तोपर्यंत नव्या घाटातून वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळं वातावरणात गारवा निर्माण झालाय. उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळं दिलासा मिळाला. परंतु, वाहतुकीची कोंडी झालेली पाहावयास मिळाली. कारण इगतपुरीत पावसानं जोरदार हजेरी लावली. रस्त्यात काही वाहनं बंद पडली. त्यामुळं वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. राज्यात बुधवारपासून पावसाचा जोर वाढलाय. मुंबईसह कोकणातही पावसाची बॅटिंग सुरू आहे. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. घाट परिसरात महामार्गालगत साईडपट्टी खचते. माती महामार्गावर येते. यामुळं वाहने चालविणे जीकरीचे काम होते. राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविलाय. काही जिल्ह्यांना एलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.