Irshalgad Landslide : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं 19 जणांचं पालकत्व, शिक्षणाचा खर्च उचलणार; नीलम गोऱ्हे यांची घोषणा

जीवनावश्यक वस्तू देऊच, पण तुम्हाला पुढे काय करायच आहे यावर पर्याय सापडत नसेल तर आम्हाला कॉल करा आम्ही नंबर देतोय. ज्यांची नोंद झाली नाही त्यांची नावे नोंदणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Irshalgad Landslide : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलं 19 जणांचं पालकत्व, शिक्षणाचा खर्च उचलणार; नीलम गोऱ्हे यांची घोषणा
CM Eknath Shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 22, 2023 | 1:11 PM

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, खालापूर | 22 जुलै 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळगड दुर्घटनेतील 19 मुलांचं पालकत्त्व स्वीकारलं आहे. या मुलांच्या शिक्षणाचा खर्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: करणार आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वत: ही माहिती दिली. त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच यावेळी नीलम गोऱ्हे यांनी दुर्घटनेत बचावलेल्या मुलांचा सर्व्हे झाला असून आता महिलांचा सर्व्हे करा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.

नीलम गोऱ्हे आज सकाळीच इर्शाळवाडीत आल्या होत्या. यावेळी त्यांनी दुर्घटनेतील पीडितांशी संवाद साधला. त्यांचं सांत्वन करत त्यांना धीरही दिला. यावेळी त्यांनी लोकांना तात्काळ मदत पोहचत आहे का ? तसेच सर्व मुले व महिलांना आवश्यक सुविधा दिल्या आहेत का? याची विचारणा केली. तसेच याबाबत या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याच्या सूचनाही दिल्या.

थेट मला फोन करा

सर्वांनी एकत्रित येऊन 10-10 जणांचा गट तयार करा. त्यातील एक जणाने सर्व पीडितांची जबाबदारी घ्यावी आणि काय वस्तू लागणार आहे त्याची यादी करा. ती आम्हाला कळवा. म्हणजे तुम्हाला त्या वस्तू पुरवता येईल. कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही. तसेच आपण एक कुटुंब असल्यासारखं एकमेकांच्या संपर्कात राहू शकू, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

तसेच गावातील स्थानिक व्यक्ती ज्याला आपण सर्व ओळखता त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही त्यांनी मुलांना केली. त्यांनी मुलांना लगेच कामाला न जाता शिक्षण पूर्ण करण्याबाबत सांगितले. काहीही लागल्यास त्यांच्या फोनवर संपर्क साधण्यास सांगितले. यावेळी त्यांनी त्यांचा स्वतःचा नंबर अनाथ मुलांना दिला.

प्रशासनाला विचारल्याशिवाय मुले देऊ नका

ज्या मुलांनी पालक गमावले आहेत, पण त्यांचे नातेवाईक घेऊन जायला येत असतील तर त्याची अधिकाऱ्यांनी नोंद ठेवावी. मुली मोठ्या होईपर्यंत आम्ही त्यांची जबाबदारी घेत आहोत. मुलांचा सर्वे झाला आहे. महिलांचा सर्वे करा. त्यांना कामाची गरज असेल तर नोंद करा. काम देण्याचा प्रयत्न करू, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

जीवनावश्यक वस्तू देऊच, पण तुम्हाला पुढे काय करायच आहे यावर पर्याय सापडत नसेल तर आम्हाला कॉल करा आम्ही नंबर देतोय. ज्यांची नोंद झाली नाही त्यांची नावे नोंदणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रशासनाला कळवल्या शिवाय मुलांना नातेवाईकांकडे सोपवू नका, अशा सूचनाही केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

त्यांचं छप्परच गेलं

अनंत भवर आणि गणेश भवर हे दोघे भाऊ आहेत ज्यांनी आपले आई वडील गमावले आहेत. गणेश हा आश्रम शाळेत शिकत होता. त्याला दुर्घटनेची माहिती नव्हती. शिक्षकांनी माहिती सांगितली तेव्हा त्याला त्याची माहिती कळाली. तर अनंत हा आई वडिलांसोबत राहतं होत. दोघांच्या आई वडिलांचे मृत्यदेह युच दिवशी दुपारी सापडले आहेत. या दोघांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.