राष्ट्रवादी अजित पवार गटातून मोठी बातमी; बड्या नेत्याला थेट राजीनामा देण्यास सांगितलं, राजकीय वर्तुळात खळबळ
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वाद समोर आला होता. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पार्थ पवार यांची तक्रार थेट शरद पवार यांच्याकडे केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वाद समोर आला होता. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात एक पत्र देण्यात आलं होतं. या पत्रामध्ये राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नाव होतं, मात्र त्या पत्रात त्यांच्या पदाचा कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता. यावरून प्रफुल पटेल हे नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, या भेटीवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित होते.
दरम्यान या भेटीवेळी प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांची शरद पवार यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली होती. परंतु यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया त्यावेळी दिली नाही असंही समोर आलं. या सर्व घडामोडींनंतर आता राष्ट्रवादीच्या गोटातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा नेतृत्वाकडून आमदार इद्रीस नायकवडी यांच्या आमदारकीचा राजीनामा मागण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 15 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ओएसडी यांनी इद्रीस नायकवडी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राजीनामा द्यावा अशी पक्षाकडून सूचना असल्याचं इद्रीस नायकवडी यांना सांगितलं होतं.
मात्र दुसरीकडे इद्रीस नायकवडी यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचं म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अशी कुठल्याही प्रकारची सूचना आपल्याला कधी देण्यात आली नव्हती, त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही अशी भूमिका यावर इद्रीस नायकवडी यांनी घेतली आहे. इद्रीस नायकवडी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार आहेत. दरम्यान उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची मुंबईत बैठक होणार आहे, या बैठकीत नायकवडी यांच्या राजीनाम्याच्या विषयावर चर्चा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.