हर्षवर्धन सपकाळ यांचा राजीनामा? गुंगी गुडिया प्रकरणामुळे प्रचंड संताप; थेट राहुल गांधी…
Sanjay Kakade : गुंगी गुडिया प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी राहुल गांधींकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला आहे. यावरून राज्याचे राजकारण तापले असून राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या विधानाचे समर्थन केले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी राहुल गांधींकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संजय काकडे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
काँग्रेसने त्यांची जात दाखवली – काकडे
राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी म्हटले की, ‘इतक्या घाण वृत्तीची काँग्रेस आहे, त्यांनी त्यांची जात दाखवून दिली. महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवेल. आम्ही त्यांना काही बोललो तर चालेल का? त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. तुम्हाला आया बहिणी आहेत की नाही. माझी राहुल गांधींना विनंती आहे की त्यांनी या अध्यक्षांना काढूण टाकले पाहिजे. काँग्रेसवाल्यांना लाज राहिली नाही.’
सपकाळ यांचा राजीनामा घ्या – काकडे
पुढे बोलताना काकडे यांनी म्हटले की, ‘इतक्या घाण आणि नालायक माणसाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष केले आहे, त्यांना राहुल गांधींनी पदावरून काढून टाकले पाहिजे. राजीव गांधी गेल्यानंतर त्यांची गुडिया कुठे गेली होती? कुठे लापता होती? त्यांनी वक्तव्य माघार घेतले नाही तर काँग्रेसच्या लोकांना राज्यात फिरू देणार नाही, त्यांच्या नेत्यांना काळं फासू. इतकी घाण वक्तव्य करायला लाज वाटत नाही का? मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी सुपारी घेऊन बोलले असतील. काँग्रेस अध्यक्षाची अध्यक्ष म्हणून लायकी राहिली नाही.
मुख्यमंत्री फडणवीसांचे जशास तसे उत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांना काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही. त्यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे बातमीत येण्यासाठी अशा पद्धतीचं विधान केलं जात आहे. बदनाम हुये तो हुये, नाम तो हुआ अशा पद्धतीने यांची कार्यवाही सुरू आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पहायला मिळत आहेत.