काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेवर CM फडणवीसांचं जशास तसं उत्तर, म्हणाले; बदनाम हुये तो…
Devendra Fadnavis : काँग्रेसने सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला आहे. यावर बोलताना विधानावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा खांद्यावर घेत उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. अशातच आता काँग्रेसने सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीसह NDA च्या नेत्यांकडून काँग्रेसवर सडकून टीका केली जात आहे. सुनेत्रा पवारांवरील विधानावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. फडणवीस नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री फडणवीसांचे जशास तसे उत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांना काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला होता. यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही. त्यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे बातमीत येण्यासाठी अशा पद्धतीचं विधान केलं जात आहे. बदनाम हुये तो हुये, नाम तो हुआ अशा पद्धतीने यांची कार्यवाही सुरू आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पहायला मिळत आहेत.
धनंजय मुंडेंचीही काँग्रेसवर टीका
काँग्रेसच्या टीकेवर बोलताना राष्ट्रवादीचे नेते म्हणाले की, ‘काँग्रेसच्या अधिकृत पेजवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली. काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार झाल्या, याचा द्वेष आहे. तसेच किती घृणा आहे. काँग्रेसने त्यांचा इतिहास पाहिला असता, खरंतर इंदिरा गांधी या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांनी कणखर काम केलं. त्याच्यापेक्षाही कणखर काम येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करून दाखवतील. काँग्रेसच्या पेजवरून हाच द्वेष पाहायला मिळाला’.
दत्रा भरणेंनी व्यक्त केला निषेध
कृषिमंत्री दत्ता भरणे यांनीही काँग्रेसच्या या टीकेचा समाचार घेतला आहे. ‘मी काँग्रेसच्या या विधानाचा निषेध व्यक्त करतो. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे मोठे सामाजिक काम आहे. उत्तम व्यवसायिक आणि शेतकरी म्हणून त्यांची ख्याती आहे. महिलांचा सन्मान म्हणून राज्याची ओळख राहिली आहे. काँग्रेसने सुनेत्रा पवार आणि महिलांची देखील माफी मागावी. काँग्रेसचा महिलांचा सन्मान करण्याचा इतिहास आहे, पण ज्यांनी हे वक्तव्य केले असेल त्यांचा निषेध.’
