NEET परीक्षेच्या नादात विद्यार्थ्याने गमावल्या दोन्ही किडनी; आजीने वाचवला जीव, पण पुढे जे घडलं…

नीट परीक्षेसाठी सलग ३ वर्षे ८ ते १० तास कठोर अभ्यास करणाऱ्या लातूरच्या विश्वजित तेलंगे या विद्यार्थ्याला दोन्ही किडनी गमवाव्या लागल्या आहेत. आजीने किडनी दिल्यानंतर तो बरा झाला, मात्र लागोपाठच्या पेपरफुटीमुळे त्याचे स्वप्न भंगले आहे.

NEET परीक्षेच्या नादात विद्यार्थ्याने गमावल्या दोन्ही किडनी; आजीने वाचवला जीव, पण पुढे जे घडलं...
Vishwajeet Telange
| Updated on: May 22, 2026 | 9:08 AM

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून नीट (NEET) परीक्षेसाठी कठोर परिश्रम घेणारे विद्यार्थी लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, याच नीट परीक्षेच्या व्यवस्थेने एका गुणवंत विद्यार्थ्याचे आयुष्य पणाला लावले आहे. तहान-भूक हरवून सलग ३ वर्षे नीटची तयारी करणाऱ्या लातूरच्या विश्वजित तेलंगे या विद्यार्थ्याला आपल्या दोन्ही किडनी गमवाव्या लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकीकडे आरोग्य धोक्यात आले असताना, दुसरीकडे लागोपाठ झालेल्या पेपरफुटीमुळे विश्वजित आणि त्याचे कुटुंबीय पूर्णपणे हताश झाले आहेत.

८ ते १० तास अभ्यास, पण नशिबात फक्त नैराश्य

विश्वजितने डॉक्टर होण्यासाठी दिवस-रात्र एक केले होते. तो रोज ८ ते १० तास कठोर अभ्यास करायचा. अशापद्धतीने अभ्यास करुन त्याने परीक्षेची तयारी केली होती. मात्र, या प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताणामुळे त्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. त्याला आपल्या दोन्ही किडनी गमवाव्या लागल्या. विश्वजितची ही अवस्था पाहून अखेर त्याच्या आजीने त्याला किडनी दान केली. गेल्या वर्षभरापासून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तो नुकताच लातूरला परतला आहे.

तीनवेळा परीक्षा दिली, तिन्ही वेळा पेपर फुटला!

विश्वजितचे दुर्दैव एवढ्यावरच थांबले नाही. त्याने आजारपणाशी लढा देत सलग तीन वेळा नीटची परीक्षा दिली. मात्र, प्रत्येक वेळी पेपर फुटल्याची बातमी समोर आली. यावर्षीही प्रकृती ठीक नसताना त्याने परीक्षा दिली, पण पुन्हा एकदा पेपरफुटीचेच सत्र पाहायला मिळाले. “आम्ही रक्ताचं पाणी करून अभ्यास करतो, शरीर पणाला लावतो. मात्र, काही लोक पैसे देऊन पेपर फोडतात आणि डॉक्टर बनतात. मग आमच्यासारख्या प्रामाणिक कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नशिबी फक्त अपयश आणि नैराश्य का?” असा सवाल विश्वजित आणि त्याच्या वडिलांनी केला.

थेट घराशेजारी पोहोचला CBI तपासाचा धागा

दरम्यान लातूर हे नीट पेपरफुटी घोटाळ्याचे मुख्य केंद्र असल्याचा संशय आता अधिक बळावला आहे. कारण, विश्वजित आणि त्याचे कुटुंबिय ज्या भागात राहतात, अगदी तिथपर्यंत आता या पेपरफुटीचा तपास पोहोचला आहे. विश्वजितच्या घराच्या शेजारीच राहणाऱ्या एका कुटुंबाची केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) थेट चौकशी केली आहे. या कारवाईमुळे लातूरमधील पेपरफुटीचे रॅकेट किती खोलवर पसरले आहे, हे स्पष्ट होत असून संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

Follow Us