रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवसाठी येणाऱ्या गणेश भक्तांसाठी आणि चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण आता जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी न करता ती थेट गावातच केली जाणार आहे. त्याकरीता नवीन नियमावली जाहीर करण्यात आलीय. रेल्वे प्रशासन, एसटी विभाग आणि गुगल फॉर्मच्या मदतीने येणाऱ्या चाकरमान्यांची आणि भाविकांची माहिती गोळा केली जाणार आहे. (new corona guidelines of ratnagiri district for corona testing asha worker will do testing in village)
गावात आलेल्या प्रत्येक चाकरमान्यांची प्राथमिक तपासणी आशा वर्करच्या मार्फत केली जाईल. त्यानंतर तपासणीअंती कोणालाही कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यास अँटीजेन किंवा RTPCR चाचणी केली जाईल. याबाबतचा सर्व सूचना ग्रामकृती दल, सरपंच पोलीस पाटील यांना देण्यात आहेत. तसेच या कामासाठी सहकार्य न करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल.
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने याबाबतची नवीन नियमावली काल रात्री जाहीर केली आहे. नव्या नियमावलीबाबत मात्र सर्वसामान्यांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. कोकण किंवा रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक येत असतात. त्यामुळे संभाव्य तिसर्या कोरोना लाटेची शक्यता लक्षात घेता नियमावली लागू करण्यात आली होती. यापूर्वी जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असणे किंवा 72 तासांपूर्वीचा RTPCR रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला होता. पण आता मात्र थेट गावात आल्यानंतरच गणेश भक्त किंवा चाकरमान्यांची कोरोना चाचणी होणार आहे.
नवीन नियमावली पाहता प्रत्यक्षात या सर्व गोष्टींची अंमलबजावणी शक्य आहे का? आगामी निवडणुका आणि यापूर्वी व्यक्त केली गेलेली नाराजी या सर्व गोष्टींमुळे अशा प्रकारचे निर्णय तर घेतला गेले नाहीत ना? शिवाय, नवीन नियमावलीमुळे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला आमंत्रण तर मिळणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
तर दुसरीकडे प्रशासनाच्या या निर्णयाचं स्वागत केलं जातंय. अस असले तरी सर्व निर्णय ग्राम कृती दल आणि आरोग्य सेविका यांच्यावर अवलंबून असल्याने गावात वाद-विवाद निर्माण होऊ शकतात. शिवाय गावात येणाऱ्या चाकरमान्यांची वेळ निश्चित नसल्यानं रात्री-अपरात्री गावात येणाऱ्या चाकरमान्यांची टेस्ट कशी होणार ? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
दरम्यान याबाबत नियोजन पूर्णपणे योग्यरितीने झाले असून ग्राम कृतीदल, आशा वर्कर, पोलीस पाटील, सरपंच त्यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांच्याकडून देखील याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय नागरिकांची देखील जबाबदारीच आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी दिली आहे.
इतर बातम्या :
“महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांची काशी झाली”, सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना जोरदार टोला
(new corona guidelines of ratnagiri district for corona testing asha worker will do testing in village)