Omicron: जालन्यात विदेशातून आलेले 16 जण नॉट रिचेबल, प्रशासन चिंतेत!

| Updated on: Dec 17, 2021 | 5:08 PM

जालन्यात विदेशातून आलेल्या 61 जणांपैकी 16 जणांचे फोन नंबर बंद असून त्यांचा पत्ता आतापर्यंत प्रशासनाला मिळालेला नाही. इतर व्यक्तींचे कोरोना अहवाल चिंताजनक नसले तरीही हे 16 जण जिल्ह्यात कुठे असतील या भीतीने प्रशासनाची झोप उडाली आहे.

Omicron: जालन्यात विदेशातून आलेले 16 जण नॉट रिचेबल, प्रशासन चिंतेत!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

जालनाः कोरोनाने मराठवाड्यातही आपले पाय रोवायला सुरुवात केल्यामुळे सर्वच जिल्ह्यात खबरदारी घेतली जात आहे. जालन्यात परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर ठेवली जात आहे. आतापर्यंत शहरात 61 जण विदेशातून आले असून त्यापैकी 16 जण अजूनही नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

16 नागरिकांशी संपर्क होऊ शकला नाही

ओमिक्रॉन आजाराच्या पार्श्वभूमीवर परदेशातून आलेल्या प्रवाशांचे स्क्रीनिंग करण्यासह त्यांची आरटीपीसीआर चाचणी घेतली जात आहे. त्यानंतर त्यांना सात दिवस अलगीकरणात ठेवले जाते. गेल्या पंधरा दिवसात जालन्यात आलेल्या 61 पैकी 16 जणांशी मात्र अद्याप संपर्क झाला नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली आहे. हेच लोक शहरात किंवा जिल्ह्यात खुलेआम फिरत असल्यास आणि त्यापैकी एखाद्याला कोरोना किंवा ओमिक्रॉनची बाधा असल्यास त्याचा संसर्ग इतरांना होऊ शकतो, अशी भीती जिल्हा प्रशासनाला वाटत आहे.

पुण्याला दर पंधरा दिवसांनी नमूने पाठवतात

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जालन्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या लाळेचे नमूने जालन्यातून दर पंधरा दिवसाला पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जातात. सुदैवाने आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या एकाही नमून्याचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले नाहीत. ओमिक्रॉनने जालन्याचा शेजारील बुलडाणा आणि लातूर जिल्ह्यातही शिरकाव केल्याने जिल्ह्यात जास्त खबरदारी घेतली जात आहे.

इतर बातम्या-

Video: गोठ्यातील शेणखुर काढण्यासाठी बळीराजाचा भन्नाट जुगाड, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून शेतकऱ्याचं कौतुक!

BWF World Championships 2021: सिंधूला पराभवाचा धक्का, तै त्झूने चुकता केला हिशोब