महाराष्ट्रातील असं एक गाव, जिथे 3 दिवस असतं फक्त भुतांचं राज्य, माणसांना नो एन्ट्री

भारतामधील अशी काही गावं आहे, जी गावं वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिद्ध आहेत. आज आपण अशाच एका गावाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या गावात काही दिवस माणसांना प्रवेशच नसतो.

महाराष्ट्रातील असं एक गाव, जिथे 3 दिवस असतं फक्त भुतांचं राज्य, माणसांना नो एन्ट्री
तीन दिवस गावात येण्यास बंदी
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 11, 2026 | 11:52 PM

भारत हा असा एक देश आहे, जिथे प्रचंड सांस्कृतिक विविधता आढळते. देशात अशी काही गावे आहेत, ज्या गावांचा विशिष्ट इतिहास आहे. काही विशिष्ट परंपरा आहेत. या परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहेत, आणि आज 21 व्या शतकात देखील या परंपरांचं पालन लोक तेवढ्याच श्रद्धेनं करतात. अशी काही गावं आहेत, ज्या गावांबद्दल स्थानिकांकडून विचित्र दावे करण्यात येतात. असंच एक गाव राजस्थानमध्ये देखील आहे, ज्याचं नाव कुलधारा आहे. या गावातील ग्रामस्थ अचानक हे गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झाले. तेव्हापासून या गावात भुतांचा निवास आहे, अशा कथा या गावाभोवती रचल्या गेल्या. या गावाला भेट देण्यासाठी दूरवरून पर्यटक राजस्थानमध्ये येतात. मात्र रात्री या ठिकाणी भीतीमुळे कोणीही थांबण्याचं धाडस करत नाही. अनेकांनी तर आपल्याला तिथे विचित्र अनुभव आल्याचा दावा देखील केला आहे. असंच एक गाव महाराष्ट्रात देखील आहे. हे गाव कोकणामध्ये आहे. या गावाचं नाव चिंदर असं आहे. या गावासंदर्भात देखील तेथील स्थानिक लोक असाच काहीसा दावा करतात. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षातील तीन दिवस या गावातील सर्व ग्रामस्थ गावातून गायब असतात. एकही व्यक्ती गावात थांबत नाही. या प्रथेला तिथे गाव पालन असं देखील म्हटलं जातं.

या गावात तीन दिवस असं काही घडतं की, या गावातील सर्व लोक हे गाव सोडून दुसरीकडे राहण्यासाठी जातात. सर्व् दुकानं, घरं सर्व काही बंद असतं. गावात कुत्रं पण दिसत नाही. ही प्रथा नेमकी कशी सुरू झाली? यामागे एक कथीत अख्यायिका आहे. गावकरी असं मानतात की हे तीन दिवस या गावात देवता आणि आत्मा यांचं वास्तव्य असतं. या काळात काही दिव्य शक्तींचा वास या गावात असतो. जर या काळात माणूस गावात राहिला तर त्याचे गंभीर परिणाम होतात, या काळात देवता आणि या आत्मांना शांततेत राहाता यावं म्हणून सर्वजण हे गाव सोडून चालले जातात. स्थानिकांकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार शेकडो वर्षांपूर्वी या गावात एक प्रचंड शक्तिशाली डुक्कर आणि त्याच्यासोबत असलेल्या काही आत्म्यांचा निवास होता. या आत्म्याची ग्रामस्थांमध्ये प्रचंड दशहत होती. त्यावेळी सर्व लोकांनी मिळून तेथील स्थानिक देवता रावलनाथ यांना साकडं घातलं आणि या संकटातून मुक्ती मिळावी अशी मागणी केली.

त्यानंतर ग्रामदेवता रावलनाथ आणि या वाईट आत्मांमध्ये एक करार झाला. या करारानुसार वर्षातील तीन दिवस या आत्मांना गावात राहण्याची परवानगी मिळाली. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. या तीन दिवसांच्या काळात ग्रामस्थ हे गाव सोडून दुसरीकडे निघून जातात. हे तीन दिवस झाल्यानंतर गावातील पुजारी हे ग्रामदेवता रावलनाथ यांची परवानगी घेतात आणि त्यानंतर सर्व ग्रामस्थ हे गावात प्रवेश करतात, या संदर्भात एबीपी माझाकडून वृत्त देण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us