पिंपळगाव बाजार समितीतले कांदा लिलाव बंद; माथाडी कामगार अन् व्यापाऱ्यांमध्ये वाद

माथारी कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे पिंपळगाव बाजार समितीतले कांदा लिलाव बंद आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

पिंपळगाव बाजार समितीतले कांदा लिलाव बंद; माथाडी कामगार अन् व्यापाऱ्यांमध्ये वाद
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 10:12 AM

लासलगावः माथारी कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे पिंपळगाव बाजार समितीतले कांदा लिलाव बंद आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

पिंपळगाव बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या गोदामावर कांद्याचे कामकाज करणाऱ्या माथाडी कामगारांच्या टोळी नंबर 2 ने विविध मागण्या केल्या होत्या. मात्र, व्यापाऱ्यांनी त्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. यावर कामगार आयुक्तांच्या कार्यालयात बैठकही झाली. मात्र, त्यानंतरही व्यापाऱ्यांनी या मागण्यांकडे दुर्लक्षच केले. हे पाहता माथाडी कामगार आक्रमक झाले आहेत. त्यांनी कांदा गोदामावर काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगारांच्या या भूमिकेमुळे पिंपळगाव बाजार समिती लिलावादरम्यान घेतलेल्या कांद्याचा निकस कसा करावा, असा मोठा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. हे पाहता कांदा व्यापारी असोसिएशनने पिंपळगाव बाजार समितीला पत्र देऊन माथाडी कामगार टोळी नंबर 2 चा निर्णय होत नाही, तोपर्यंत कांदा लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र बाजार समितीला दिले आहे. त्यामुळे हे लिलाव पुढील सूचनेपर्यंत बेमुदत बंद राहणार आहेत. दुसरीकडे दिवाळीनंतर लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत. लिलाव सुरू होताच कांद्याच्या बाजार भावात प्रति क्विंटलमागे चारशे रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

इराणचा कांदा दाखल

पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी नाफेड मार्फत 1 लाख 85 हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली आहे. यापैकी 1 लाख 15 हजार मेट्रिक टन कांदा देशांतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळी सुट्ट्यानिमित्त लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असतानाच हा निर्णय झाला. यावरच न थांबता इराण येथून 70 कंटेनरमधून हा कांदा आयात करण्यात आला असून, यातील 25 कंटेनर हे मुंबईत आले आहेत. मात्र, देशांतर्गत कांद्याच्या मागणीमुळे लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव पूर्ववत होताच गेल्या दहा दिवसांच्या तुलनेत चारशे रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सकाळच्या सत्रात 550 वाहनांमधून आलेल्या कांद्याला कमाल 3251 , सर्वसाधारण 2750 तर किमान 1000 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळाले, तर लाल कांद्याला 3100 रुपये इतका बाजार भाव मिळाला.

आयात थांबण्याची मागणी

पोटाच्या पोराप्रमाणे कांद्याचे पीक वाढवले आहे. त्याला चांगला बाजारभाव मिळेल म्हणून कांदा चाळीत साठवला. मात्र, बदलत्या हवामानामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. आज जरी तीन हजार रुपये इतका बाजार भाव कांद्याला दिसत असेल, पण सर्वसाधारण 2 ते अडीच हजार इतकाच बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने विदेशातून होणाऱ्या कांद्याची आयात थांबवावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. (Onion auction at Pimpalgaon market committee closed)

इतर बातम्याः

साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा उल्लेख नाही; भूमिपुत्रालाच डावलल्याने नाराजीचे सूर

बहुचर्चित कांदे-भुजबळ वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; प्रशासकीय कागदपत्रे मागवली

Follow Us