विरार / विजय गायकवाड : मुलाच्या जन्माने अख्ख कुटुंब आनंदात होते. बाळ तीन महिने झाले होते म्हणून पती आनंदात पत्नी आणि बाळाला घरी आणण्यासाठी सूरत येथे गावी गेला होता. तीन महिन्यांच्या बाळासह पती-पत्नी सूरतवरून विरारपर्यंत ट्रेनमध्ये सुखरूप आले. पण विरारहून वसईतील आपल्या घरापर्यंत पोहचू शकले नाही. विरारला उतरल्यानंतर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर वसईला जाणारी गाडी पकडण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडायला गेले आणि इथेच घात झाला. नेमकी त्याचवेळी त्या रुळावर एक्स्प्रेस ट्रेन आली अन् क्षणात होत्याच नव्हतं झालं. रेल्वेच्या धडकेत तिघांचाही दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूरतहून हे जोडपे तीन महिन्यांच्या बाळासह विरारला आले. विरारला प्लॅटफॉर्म क्र. 5 वर ट्रेन थांबली. पण प्लॅटफॉर्मवर उतरण्याऐवजी प्लॅटफॉर्म नंबर 4 वर जाण्यासाठी हे जोडपे विरुद्ध दिशेला रेल्वे रुळावर उतरले. मात्र रेल्वे रुळ ओलांडत असतानात पुण्यावरून वसईमार्गे गुजरातला भरगाव वेगात विरावली एक्स्प्रेस आली. याच एक्स्प्रेसच्या धडकेत या कुटुंबाचे एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. जोडप्याला विरारहून लोकल पकडून वसईला जायचे होते. पण थोड्याशा घाईने अख्खे कुटुंबच उद्धवस्त झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटना अतिशय दुर्दैवी आहे. रेल्वे रूळ ओलांडू नका, पुलाचा वापर करा अशा नेहमी सूचना रेल्वे प्रशासनाकडून दिल्या जातात. अनेक वेळा महामार्ग पोलीस, रेल्वे पोलीस कारवाही करतात. पण प्रवाशी जीवघेणी घाई करतात आणि जीवन संपवतात. प्रथम आम्हाला यांची ओळख पटली नव्हती. आम्हाला मिळालेल्या काही पुराव्याच्या आधारे नातेवाईकांचा शोध घेऊन मयतांची ओळख पटवली आहे. शासकीय प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत, अशी माहिती वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी सांगितले.