माझ्या नावात ‘सत्ता’र… कुणाचीही सत्ता आली की आपलं नाव पक्के, अब्दुल सत्तार हे काय बोलून गेले; चर्चा तर होणारच

| Updated on: Mar 26, 2023 | 9:52 AM

माझ्या नावातच सत्तार आहे. त्यामुळे कुणाचीही सत्ता आली की आपलं नाव पक्के, असा दावाच राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व रिक्तपदे येत्या सहा महिन्यात भरण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

माझ्या नावात सत्तार... कुणाचीही सत्ता आली की आपलं नाव पक्के, अब्दुल सत्तार हे काय बोलून गेले; चर्चा तर होणारच
abdul sattar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हिंगोली : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हैरान झालेला आहे. त्यामुळे या नुकसानीची कृषी मंत्र्यांनी पाहणी करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. ही मागणी होत असतानाच सत्तार यांनी रात्रीच्यावेळी पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली. त्यामुळे सत्तार चर्चेत आले. आता आणखी एका विधानाने ते चर्चेत आले आहेत. माझ्या नावात सत्तार आहे. कुणाचीही सत्ता आली की आपण पक्के, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. सत्तार यांच्या या विधानाने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राज्याचे कृषी मंत्री तथा, हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे काल हिंगोली जिल्हाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागात पाहाणी केली. त्यानंतर ते हिंगोली येथील रामलीला मैदानावर आयोजित कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित झाले. यावेळी मेळाव्यातील शेतकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. जेव्हा राष्ट्र आणि महाराष्ट्राच्या गोष्टी असतात तेव्हा सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. शेतकऱ्यांची क्रांती घडवायची असेल आणि शेतकऱ्याला मदत करायची असेल तर राज्याची तिजोरी असो किंवा केंद्राची तिजोरी असो याचा सगळ्यात मोठा वाटा शेतकऱ्याच्या वाट्याला जायला हवा. कृषीमंत्री म्हणून माझी हीच भावना राहील, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सामान्य कुटुंबातून आलो

मी तुमच्या सारखाच एक सामान्य कुटुंबातून आलो आहे. बस माझी बॅटरी चार्ज केली आणि मी इथं पर्यंत आलो. भाऊ आले (हेमंत पाटील ) इतक्या वर्षापासून आपण सत्तेत आहे. शेवटी नावात सत्तार आहे. त्यामुळे कोणाचीही सत्ता आली की आपण पक्के असं सत्तार यांनी म्हणताच स्टेजवर आणि सभेच्या ठिकाणी एकच हश्या पिकला. सत्तार यांच्या या विधानाने सभेत हशा पिकला असला तरी त्यांच्या विधानाने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. सत्तार यांच्या विधानाचा अर्थ काय? अशी कुजबुज सुरू झाली आहे.

ये जमाना दाढीवालोंका हैं

हिंगोली जिल्ह्यात अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. पुढच्या सहा महिन्यात सर्व पदे भरले जातील. आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांना, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पद रिक्त असल्याने फार चिंता लागली आहे. त्यामूळे त्यांची दाढी वाढली. ये जमाना दाढीवालोंका हैं, असं म्हणताच पुन्हा एकदा हशा पिकला.