या रानभाज्या तुम्ही खाल्ल्यात का, महत्त्व जाणून व्हालं थक्क!

| Updated on: Aug 12, 2023 | 5:51 PM

रानभाज्यांकडे रानमेवा म्हणून पाहिले जाते. या रानमेव्याची लज्जत काही औरच असते.

या रानभाज्या तुम्ही खाल्ल्यात का, महत्त्व जाणून व्हालं थक्क!
Follow us on

अकोला : रानभाज्या म्हणजे जंगलात आपोआप उगवणाऱ्या भाज्या. या रानभाज्या ग्रामीण भागात तसेच जंगल परिसरात जास्त प्रमाणात आपोआप होतात. त्यासाठी कुणी त्याची स्वतःहून लागवड करत नाही. त्यासाठी कुणी खत घालत नाही. कुणी रासायनिक फवारण्या करत नाही. त्यामुळे रानभाज्यांकडे रानमेवा म्हणून पाहिले जाते. या रानमेव्याची लज्जत काही औरच असते. या रानभाज्यांची लज्जत न्यारी. त्यामुळे या काळात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले जाते. रानभाज्यांचे महत्त्व या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवले जाते.

पावसाची रीपरीप सुरू झाली की रानभाज्याही बाजारात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले दर्दी त्या आवर्जून खरेदी करतात. प्रेमाने या भाज्या बनवून खाल्ल्या जातात. पाऊस सुरु झाला की या रानभाज्या रानमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात.


नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या

वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रीय अन्न होय. कोणतंही खत किंवा कीटकनाशक नाही. कोणतीही लागवड नाही. अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना रानभाज्यांविषयी ओळख आणि माहिती व्हावी. याकरिता रानभाज्यांची ओळख आणि संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान आहे.

रानभाजी महोत्सवाचे आयोजन

संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने हा रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये अकोला जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या आणि रानफळांची वैशिष्टे, गुणधर्म लोकांपर्यंत पोहचवले जातात. आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पद्धती, भाजीची पाककृती याची सचित्र माहिती देण्यात येते.

याद्वारे रानभाज्यांना ओळख मिळून त्यांची विक्रीव्यवस्था आणि उत्पादनसाखळी निर्माण होईल. या हेतूने ग्राहकांना पोषणमूल्य असलेल्या भाज्या उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

या आहेत रानभाज्या

रानातील मेवा म्हणून अंबाडी, चिवळी, केना, शेवगा, सुरण, करवंद, आघाडा, टरोटा, पिंपळ, भूई आवळा, करटोली, राजगुरा, वाघाटे, फांदीची भाजी, कुंजीर भाजी, चमकुराचे पाने, काटसावर, जिवतीचे फुलं आणि इतर प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी रास्त भावात उपलब्ध असतात. त्यामुळे शहरातील नागरिक आवर्जून रानभाजी महोत्सवामध्ये भेट देतात. रानभाज्य खरेदी करतात.