अहमदनगर : देशातील सद्यपरिस्थितीवर बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनता कुंभकर्णासारखी झोपलीय, असं मत व्यक्त केलं. “आपण आंदोलनं करून लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करून घेतले. मात्र, आता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर पास करण्यात येत आहे. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहे. जनताच कुंभकर्णासारखी झोपली. त्यामुळे हे शक्य आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. त्यांनी देश बचाव जन आंदोलन समितीच्या प्रतिनिधींशी राळेगण सिद्धी येथे चर्चा करताना आपली भूमिका मांडली.
जनआंदोलन समितीने 3 कृषी कायदे, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि देशात सुरू असलेलं सरकारी कंपन्या विकण्याचं धोरण यावर केंद्र सरकार विरुद्ध आवाज उठविण्याचं आवाहन अण्णा हजारेंना केलं होतं. तसेच अण्णा हजारे यांनी तसं न केल्यास केंद्र सरकार आणि अण्णा हजारेंविरुद्ध राळेगणसिद्धीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर देश बचाव जन आंदोलन समितीचे पदाधिकारी अण्णांना भेटले.
अण्णा हजारे म्हणाले, “आता जनतेने आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे. तेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द करेल. माझं वय 84 वर्षे आहे. मी कधीपर्यंत लढू, देश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभा करा, मी तुमच्यासोबत आवश्य येईल.”
यावेळी देशात सरकारकडून मागणी नसताना लादण्यात येत असलेल्या कायद्यांवर, सरकारी कंपन्या विकण्याच्या धोरणांवर अण्णा हजारे यांनी खंत व्यक्त केली. “देशातील जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे. ही जनता जोपर्यंत जागी होत नाही आणि सरकार बदलण्याची ताकद उभी करत नाही, तोपर्यंत सरकार झुकणार नाही. असेच कायदे आणि निर्णय लादण्यात येतील,” असंही अण्णा हजारे म्हणाले.
उपस्थिती देश बचाव जन आंदोलनाच्या सदस्यांनी अण्णा हजारे यांना 2012 मधील आंदोलनाची आठवण करून दिली. तसेच तुमच्या शब्दाला दिल्लीत वजन असल्याचं सांगत भूमिका घेण्यास सांगितलं. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, “शेतकरी कायदे, वाढती महागाई, बेरोजगारी याविरुद्ध लढा देण्यासाठी तुम्ही संघटन उभं करा, मला जेव्हा वाटेल तुम्ही योग्य मार्गाने जात आहात, तर मी तुमच्या आंदोलनात आवश्य सहभागी होईल. तसेच मी जागा आहे, मी काही झोपलेलो नाही.”
समितीचे सदस्य मारुती भापकर यांनी अण्णा हजारे यांना दिल्लीतील कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्याची विनंती केली. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, “शेतकरी आंदोलन सुरू होऊन इतके दिवस झाले, पण दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्याशी संपर्क केला नाही. मी शेतकरी प्रश्नावर 5 वर्षांपासून पाठपुरावा करतोय. केंद्रीय कृषीराज्यमंत्र्यांनी देखील कृषी कायद्यांसंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमण्याचा शब्द दिलाय. कोरोनामुळे समिती स्थापन झाली नाही. मात्र तरी मी पाठपुरावा करत आहे.”
देश बचाव जन आंदोलनाच्या समितीत अॅड. रवींद्र रणसिंग, रवींद्र देशमुख, मारुती भापकर, सागर आल्हाट, दुर्गा भोर, मुकुंद काकडे, अॅड. देविदास शिंदे यांचा समावेश होता.
Anna Hazare blame people for current political situation and new farm laws