भरोसा सेलने संसार सावरले, सहा महिन्यात बुलडाण्यात 72 कुटुंबांतील कलह मिटले

| Updated on: Jun 14, 2021 | 12:41 PM

महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक अन्याय अत्याचाराच्या संदर्भात महिलांना न्याय देण्यासाठी भरोसा सेलची स्थापना करण्यात आली आहे

भरोसा सेलने संसार सावरले, सहा महिन्यात बुलडाण्यात 72 कुटुंबांतील कलह मिटले
करोडपती प्रॉपर्टी डिलरच्या पत्नीचे 13 वर्षांनी लहान रिक्षाचालकासोबत पलायन
Follow us on

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात कौटुंबिक कलह कमी करण्यात पोलिसांच्या भरोसा सेलला यश आलं आहे. बुलडाणा शहर पोलीस ठाणे परिसरात असलेल्या भरोसा सेलमध्ये 2020 मध्ये 446 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी 132 कुटुंबांचे समुपदेशन करुन महिलांचे संसार पुन्हा सुरळीत सुरु झाले आहेत, तर यावर्षी 72 कुटुंबांचा समझोता करुन कौटुंबिक वादाचा निपटारा केला आहे. (Buldana Bharosa Cell pacifies 72 Couples)

बुलडाणा जिल्ह्यात कौटुंबिक कलहाचे प्रमाण नगण्य

देशात आलेल्या कोरोना महामारीने सर्वांनाच चांगली शिकवण दिली आहे. ज्याचे सर्वांच्याच मनावर चांगले-वाईट परिणाम झाले आहेत. सकारात्मक दृष्टीने विचार केल्यास या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच कुटुंबातील व्यक्तींनी एकत्र राहून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला आहे. तर दुसरीकडे पती-पत्नीसह सर्वच कुटुंबातील व्यक्ती एकत्रित असल्याने कौटुंबिक कलह देखील वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लॉकडाऊन काळात बुलडाणा जिल्ह्यात कौटुंबिक कलहाचे प्रमाण नगण्य असल्याचे भरोसा सेलच्या माध्यमातून समोर आले आहे.

कौटुंबिक वादाचा निपटारा

महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक अन्याय अत्याचाराच्या संदर्भात महिलांना न्याय देण्यासाठी भरोसा सेलची स्थापना करण्यात आली आहे, त्या माध्यमातून बुलडाणा शहर पोलीस ठाणे परिसरात असलेल्या भरोसा सेलमध्ये 2020 मध्ये 446 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 132 कुटुंबांचे समुपदेशन करुन त्या महिलांचे संसार पुन्हा सुरळीत सुरू केले आहेत. तर 2021 मध्ये 207 तक्रारींपैकी 72 कुटुंबांचा समझोता करुन कौटुंबिक वादाचा निपटारा केला आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन काळात सर्व कुटुंब एकत्रित असल्याने त्याचा परिणाम हा कौटुंबिक वादात झाल्याने या तक्रारींचे प्रमाण वाढल्याची माहिती आहे. मात्र त्या तुलनेत बुलडाण्यात लॉकडाऊनमध्ये कुठल्याही प्रकारे परिणाम झाला नसून इतर काळामध्ये ज्या पद्धतीने कुटुंबात विविध समस्यांना घेऊन वाद निर्माण होत होते, तसेच वाद या काळात देखील पाहायला मिळाले आहेत.

भरोसा सेलकडे संपर्क साधण्याचं आवाहन

वैवाहिक जीवनात वावरत असताना महिलांना कुठल्याही प्रकारचा छळ किंवा शोषण होत असल्यास त्यांनी भरोसा सेलकडे संपर्क करावा, असे आवाहन भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका निकाळजे यांनी केले आहे. कुटुंबात कलह निर्माण झाल्याने त्यांचे समुपदेशन करण्यासाठी अलका सरदार, कल्पना हिवाळे, सुर्यकिरण साबळे हे महत्वाची भूमिका बजावत असून अनेक संसार यांनी पुन्हा सुरळीत फुलवण्याचे काम केले आहे.

संबंधित बातम्या :

कौटुंबिक कलहाला कंटाळून औरंगाबादेत विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

(Buldana Bharosa Cell pacifies 72 Couples)