धुळ्यात एक, दोन नव्हे तर तब्बल 19 मोर मृतावस्थेत आढळले, विषबाधेने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

शिरपूर तालुक्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने तालुक्यासह वन विभागात खळबळ उडाली होती.

धुळ्यात एक, दोन नव्हे तर तब्बल 19 मोर मृतावस्थेत आढळले, विषबाधेने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
dhule peacoack death
| Edited By: | Updated on: Jul 06, 2021 | 3:38 PM

धुळे : एक, दोन नव्हे तर तब्बल 19 मोरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धुळ्यातील जैतपूर गावात घडली आहे. या मोरांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी किटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे. (Dhule Jaitpur 19 peacocks were found dead due to poisoning)

तब्बल 19 मोरांचा दुर्देवी मृत्यू 

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जैतपूर परिसरात 1 जुलैला 11 च्या सुमारास 6 मोर, 6 लांडोर आणि 1 तीतर मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली होती. तर 1 लांडोर जखमी झाल्याचेही उघडकीस आले होते. त्यानंतर पुन्हा 3 जुलैला 3 लांडोर आणि 2 मोर मृतावस्थेत आढळले होते. तर एका मोराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामुळे गेल्या काही दिवसांत तब्बल 19 मोरांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.

विषारी कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

शिरपूर तालुक्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने तालुक्यासह वन विभागात खळबळ उडाली होती. सध्या सर्वत्र खरीपाचा हंगाम सुरु असल्याने शेत शिवारात कापूस पिकासह इतर पिकांची पेरणी सुरु आहे. त्यामुळे सध्या बियाणे किंवा रोपांवर पेरणी अगोदर विषारी कीटकनाशक फवारणी केली जात आहे. हेच बियाणे मोरांनी उकरुन खालल्याने त्यांना विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

अन्नातून विषबाधा

शिरपूर तालुक्यातील जैतपूर परिसरात जास्त प्रमाणात बागायती क्षेत्र आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बारमाही पिके घेतली जात असल्याने अन्न आणि पाणी मुबलक आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक परिसरात मोर वास्तव्यास आहेत. तर हाकेच्या अंतरावर तापी नदी असून या परिसरात वन्यप्राण्यांना जिवाचे संरक्षण करण्यासाठी झाडी झुडपं आहेत. त्यामुळे या ठिकाणी वन्यप्राण्यांचेही मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे.

मात्र याच ठिकाणी तब्बल 19 मोरांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जैतपूर परिसरात सकाळी ठिकठिकाणी मोरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या मोराचा मृत्यू अन्नातून विषबाधा झाल्याने झाल्याचे सांगितले होते.

वनअधिकाऱ्यांचे आवाहन 

यामुळे वन्यजीवांना जंगलांमध्ये पाणवठे आणि पुरेसे अन्न मिळेल याची व्यवस्था करावी. तसेच पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी देखील विशेष काळजी घ्यावी. जेणेकरून कीटकनाशकांच्या फवारणीमुळे वन्यजीवांचा मृत्यू होणार नाही असे आवाहन वन अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

(Dhule Jaitpur 19 peacocks were found dead due to poisoning)

संबंधित बातम्या : 

कानठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरचा चुराडा, अंबरनाथमध्ये 150 सायलेन्सरवर रोडरोलर

जगातल्या 5 विषारी वनस्पती, काही सेकंदात घेऊ शकतात कुणाचाही जीव!

सोलापूर महापालिकेचे डॉक्टर संपावर, पगार कपात केल्यानं कामबंद आंदोलनाला सुरुवात