अखेर पोटातलं ओठावर आलं?, गुलाबराव पाटील म्हणाले, मंत्रिपदाचा सट्टा लावूनच…

आपल्यातला एक मराठा चेहरा आपल्यापासून लांब जात असून तो जाता कामा नये हे उद्धव ठाकरेंना आधी समजावलं होतं. तसेच उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना हातपाय जोडून त्यांना विनंती देखील केली होती.

अखेर पोटातलं ओठावर आलं?, गुलाबराव पाटील म्हणाले, मंत्रिपदाचा सट्टा लावूनच...
gulabrao patil
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 12, 2023 | 8:07 AM

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी बंड केल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यासोबत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नव्हते. त्यामुळे सर्वजण गेले तरी गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहतील अशी चर्चा होती. मात्र, अवघ्या तीन दिवसातच हे चित्रं पालटलं. उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर तीन दिवसानंतर गुलाबराव पाटील यांनी थेट गुवाहाटी गाठलं. गावाला जातो म्हणून सांगून गुलाबराव पाटील थेट गुवाहाटीत पोहोचले. त्यामुळे गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्यासोबत का गेले? त्यामागचं कारण काय याची चर्चा चांगलीच रंगली होती. अखेर गुलाबराव पाटील यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेलो? हे स्पष्ट केलं आहे.

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा येथे गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विकासकामांचं उद्धाटन आणि भूमीपूजन सोहळ्याचं आयेाजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. मंत्रीपदाचा सट्टा लावत एकनाथ शिंदे यांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये एका कार्यक्रमात केलं. उद्धव ठाकरे हे चुकीच्या मार्गाने जात जात असल्याची कल्पना आली होती. त्याची कल्पना आम्ही त्यांना दिली. त्यांना विनंतीही केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास सांगितलं. मात्र तुम्हाला जायचं असेल तर जा असे संजय राऊत यांनी म्हटलं. त्यामुळे मीही मंत्रिपदाचा विचार केला नाही. बाळासाहेबांचे विचार घेऊन जात असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

तर मतदारसंघाचा विकास करू शकलो नसतो

मंत्रीपदाचा सट्टा लावून आम्ही तो निर्णय घेतला होता कदाचित हा सत्तेचा प्रयोग फसला असता तर? मात्र तरीदेखील मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटलांनी सांगितलं. नागपूरपासून ते दादरपर्यंत सर्व गेले. त्यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदारसंघात विकास करू शकलो नसतो, असंही त्यांनी सांगितलं.

मराठा चेहरा लांब जातोय

आपल्यातला एक मराठा चेहरा आपल्यापासून लांब जात असून तो जाता कामा नये हे उद्धव ठाकरेंना आधी समजावलं होतं. तसेच उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असताना हातपाय जोडून त्यांना विनंती देखील केली होती. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने मी उद्धव ठाकरेंना सोडून गेलो, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

बोलबच्चन, अमिताभ बच्चन नको

कामाला उत्तर द्या आणि कामानेच बोला. शेतकऱ्यांना आणि जनतेला काम हवंय. बोलबच्चन, अमिताभ बच्चन नको. त्यामुळे खोके बोलून विकास होत नाही, तर खोक्यांचा विकास झाला पाहिजे. खोके देऊन लोकांची कामं केल्या गेली पाहिजे आणि ते काम मी करत आहे, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेही लॉकडाऊन होते

उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये जलद गतीने कामे करू शकलो नाही. मात्र आता मूळ कामे सुरू झाली असून स्वातंत्र्यानंतर प्रथमच सात महिन्यात पाच वेळा जळगाव जिल्ह्यात येणारे एकनाथ शिंदे हे एकमेव मुख्यमंत्री ठरले आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात सगळेच लॉकडाऊनमध्ये होते. स्वतः उद्धव ठाकरे लॉकडाऊन होते, अशी टीकाही त्यांनी केली.

म्हणून पवार निवडून आले

राष्ट्रवादीच्या नाराज लोकांनी मतदान केल्याने संजय पवार निवडून आलेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर गुलाबराव पाटील माध्यमांशी बोलत होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीतकडून अध्यक्षपदासाठी दोन अर्ज आले. त्यानंतर राष्ट्रवादीतल्या नाराज लोकांनी मतदान केल्याने संजय पवार निवडून आले अस गुलाबराव पाटील म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us