VIDEO: पंढरपूरला भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र बनवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन

| Updated on: Nov 08, 2021 | 5:49 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंढरपूर पालखी मार्गाचे चौपादरीकरण भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. (PM Modi lays foundation stone of highway projects in Maharashtra)

VIDEO: पंढरपूरला भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र बनवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन
PM Modi
Follow us on

पंढरपूर: पंढरपूरने भक्तीच्या शक्तीने मानवतेची ओळख करून दिली. लोक देवाकडे काही मागायला येत नाही. नुसत्या विठू माऊलीच्या दर्शनाने त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटतात, असं सांगतानाच भक्ती आणि शक्तीचं प्रतिक असलेलं पंढरपूर भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झालं पाहिजे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंढरपूर पालखी मार्गाचे चौपादरीकरण भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. या मार्गाचे चौपदरीकरण होत आहे. पण त्यासाठी मला तुमच्याकडून तीन महत्त्वाच्या गोष्टी हव्या आहेत. एक म्हणजे या मार्गाभोवती छाया देणारी रोपं लावा. म्हणजे या रोपांचं वृक्षात रुपांतर झाल्यावर या संपूर्ण महामार्गावर सावलीचं अच्छादन निर्माण होईल. त्याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा प्याऊ बांधा. वारीला येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांना आणि प्रवाशांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे, त्यासाठी प्याऊ बांधा. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंढरपूरमध्ये स्वच्छता राखली गेलीच पाहिजे. जगातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ तीर्थक्षेत्रं कोणतं? असा सवाल कुणी केल्यास पंढरपूर हेच नाव समोर आलं पाहिजे, असं मोदी म्हणाले.

मार्ग वेगळे, पण ध्येय एकच

पंढरपूरची वारी वेगवेगळ्या मार्गाने जात असते. मात्र, सर्वांचं अंतिम ध्येय एकच आहे. हीच आपली परंपरा आहे. शिकवण आहे. आपले विचार, उपासना पद्धती वेगवेगळी असू शकते. पण लक्ष्य एकच आहे. शेवटी सर्व पंथ हे भागवत पंथ आहेत. भगवान विठ्ठलाचा दरबार प्रत्येकासाठी समानतेने खुला आहे. जेव्हा मी सबका साथ, सबका विकास म्हणत असतो. त्यामागे माझी हीच भावना असते. हीच भावना देशाच्या विकासासाठी मला प्रेरित करत असते. सर्वांची साथ घेऊन सर्वांचा विकास करण्याची प्रेरणा मला मिळत असते, असं ते म्हणाले.

महिलाही सर्वात पुढे

पंढरपूरची वारी ही जगातील सर्वात प्राचीन वारी आहे. जनतेचा मोठा सहभाग असलेली ही वारी आहे. पिपल्स मुव्हमेंट म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते. आषाढी एकादशीतील पंढरपुरातील विहंगम दृश्य कोण विसरू शकेल. हजारो-लाखो भाविक या यात्रेच्या दिशेने आपोआप ओढले जातात. भूतकाळात भारतावर अनेक आक्रमण झाली. आपला देश शेकडो वर्ष गुलामीत होता. नैसर्गिक आपत्ती आली, आव्हान आली, पण विठ्ठलावरील आपली आस्था तसूभरही ढळली नाही. वारीच्या माध्यमातून आपली दिंडी अनवरत सुरूच राहिली, असं त्यांनी सांगितलं. वारकरी आंदोलनाचं एक वैशिष्ट्ये म्हणजे या आंदोलनात पुरुषांच्या पावलांवर पावलं ठेवून महिलाही सहभागी होतात. देशाची स्त्री शक्ती इथेच दिसते. पंढरीची वारी म्हणजे समानतेची संधीच आहे. म्हणूनच भेदाभेद अमंगळ हे या वारीच्या आंदोलनाचं ध्येय वाक्य आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

पंढरपूरकडे जाणारे हे मार्ग भागवत मार्गाची पताका आणखी उंचावेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंढरपूरकरांना तीन आशीर्वाद मागितले; या तीन गोष्टी कोणत्या?

पाण्याला खळखळाट, तसा भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद : मुख्यमंत्री

(PM Modi lays foundation stone of highway projects in Maharashtra)