इतकी असंवेदनशीलता कुठून येते?, संभाजी राजे यांचा राज्यकर्त्यांना संतप्त सवाल; कारण काय?

| Updated on: Mar 19, 2023 | 9:44 AM

राज्यात सुमारे 15 जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वादळी वारा आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही मदत पोहोचलेली नाही.

इतकी असंवेदनशीलता कुठून येते?, संभाजी राजे यांचा राज्यकर्त्यांना संतप्त सवाल; कारण काय?
sambhaji chhatrapati
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर : राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. काही ठिकाणी तर गारपीटी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं झोपली आहेत. गहू, ज्वारी, कापूस, सोयाबीन सह इतर महत्त्वाची हाती आलेली पीकं हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रब्बींच्या पिकांसह फळबागांचंही नुकसान झालं आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. राज्य सरकारमधील कोणताही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावरही फिरकलेला नाही. त्यावर माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकी असंवेदनशीलता येथे कुठून? असा संतप्त सवाल संभाजी राजे यांनी राज्यकर्त्यंना विचारला आहे.

हे सुद्धा वाचा

माजी खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून हा संताप व्यक्त केला आहे. अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाली आहेत. अशा परिस्थितीत राज्यसरकारने आणि कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार आणि कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल, असा संताप छत्रपती संभाजी राजे यांनी केला आहे.

हिंगोलीला अवकाळीचा फटका

हिंगोली जिल्ह्यात हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळी बहुतांश ठिकाणी विजेच्या गडगडाटसह प्रचंड पाऊस झाला. यावेळी गारपीटही झाली.वारा आणि अवकाळी पावसाने परिसरातील हरभरा, गहू, भाजीपाला, फळ बाग शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संत्रा तोडणीला आला होता. अनेक शेतकऱ्यांची संत्रा बाग विकलीही नव्हती. वादळी वाऱ्याने संत्रा, केळी, आंबा जमीनदोस्त झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे संत्रा, आंबा, केळी उत्पादकांना फटका बसला आहे. झाडांवरील संत्रा, आंबा गळून पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे.

 

नाशिकमध्ये चार दिवस अवकाळीने दाणादाण

नाशिक जिल्ह्यात सलग चार दिवस अवकाळी पावसाने हजरी लावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसाने द्राक्ष, गहू, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे द्राक्ष मण्याला तडे पडल्याने द्राक्ष पिकांना भाव मिळत नाही. तसेच काढणीसाठी आलेला गहू देखील आडवा झाला आहे. जिल्ह्यातील निफाड, येवला, सिन्नर, देवळा या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. या नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश सरकारने प्रशासनाला दिले आहेत. मात्र आता महसूल कर्मचारी संपावर गेल्याने पंचनामा होणार कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाशिममध्ये मोठं नुकसान

वाशिम जिल्ह्यातील मालेगांव, मंगरुळपीर, रिसोड, मानोरा आणि कळंबा महाली, पांगरी नवघरे, इंझोरी, वाई वारला, पांगरा बंदी, वनोजा, खिर्डासह अनेक ठिकाणी शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. त्यामुळे शेकडो हेक्टरावरील डाळिंब, लिंबू बागांसह टरबूज, कांदा, उन्हाळी मूग, रब्बी गहू, हरभरा या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. या पीक नुकसानीचे पंचनामे करून दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.