ईडीचे अधिकारी राजारामबापू बँकेत तळ ठोकून, 28 तासांपासून 80 कर्मचारी अडकले

| Updated on: Jun 24, 2023 | 8:35 PM

सांगलीत ईडीकडून कडक कारवाई सुरु आहे. सांगलीतील 5 बडे व्यापारी हे ईडीच्या रडारवर आले आहेत. या व्यापाऱ्यांनी पैशांच्या व्यवहारात अनियमितता केल्याचा ईडीला संशय आहे. त्यासाठी या व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांची देखील ईडीकडून चौकशी सुरु आहे.

ईडीचे अधिकारी राजारामबापू बँकेत तळ ठोकून, 28 तासांपासून 80 कर्मचारी अडकले
Follow us on

सांगली : ईडीकडून सांगलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी देखील छापेमारी सुरु आहे. सांगलीतील इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रेते पारेख बंधू आणि इतर व्यापाऱ्यांवर ईडीची छापेमारी सुरु आहे. विशेष म्हणजे गेल्या 28 तासांपासून ईडीच्या अधिकाऱ्यांकडून बँकेत तपास सुरु आहे. याआधी पारेख बंधुंच्या रहिवासी ठिकाणी सुद्धा छापेमारी झाली होती. ईडी अधिकाऱ्यांनी पारेख बंधूंसह पाच व्यापाऱ्यांच्या घरी धाडी टाकल्या. या धाडसत्रात व्यापाऱ्यांचे सात बँकांमध्ये खाती आहेत. त्या बँकांमध्ये जावून ईडी अधिकाऱ्यांकडून तपास करण्यात आला.

विशेष म्हणजे राजारामबापू सहकारी बँकेची इस्लामपूर येथे असलेल्या मुख्य शाखेत ईडी अधिकाऱ्यांचा कालपासून तपास सुरु आहे. ईडीचे 10 अधिकारी कालपासून आपल्या 4 वाहनांसह तळ ठोकून आहेत. ईडी अधिकाऱ्यांकडून आज सकाळपासूनदेखील चौकशी सुरु आहे.

80 कर्मचारी बँकेत अडकले

राजारामबापू सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत ईडी अधिकाऱ्यांनी कालपासून तळ ठोकल्यामुळे बँकेचे तब्बल 80 कर्मचारी बँकेत अडकून पडले आहेत. यापैकी एकाही कर्मचाऱ्याला बँकेच्या बाहेर जाता येत नाहीय. याशिवाय बाहेर कुणालाही बँकेच्या आत सोडलं जात नाहीय. त्यामुळे कर्मचारी वर्ग देखील धास्तावल्याची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

‘ईडीच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही’

दरम्यान, राजारामबापू सहकारी बँकेचे चेअरमन शामराव पाटील यांनी ईडीच्या छापेमारीवर प्रतिक्रिया दिली आहे. “ईडीच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही. राजारामबापू बँकेने गेल्या 42 वर्षात कोणत्याही बँक व्यवहारात अनियमिता केली नाही”, असे स्पष्ट मत शामराव पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना व्यक्त केलं आहे. त्यामुळे ईडीची कारवाई आता कुठपर्यंत जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ईडीच्या कारवाईने महाराष्ट्रात खळबळ

महाराष्ट्रात ईडीच्या कारवाईने खळबळ उडाली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ईडीच्या कारवाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ईडी अधिकाऱ्यांनी मुंबईत एकाच दिवशी तब्बल 16 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली. मुंबई महापालिकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून सुरु असलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी नेमकं काय-काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ईडीचं मुंबईत धाडसत्र सुरु असताना ईडीने सांगलीतही धाडी टाकल्या. अर्थात या दोन्ही कारवायांचा परस्परांशी संबंध नाही. पण या दोन्ही शहरांमधील ईडी कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं आहे.

दुसरीकडे मुंबईतील ईडीच्या धाडसत्रावरुन राजकारण चांगलंच पेटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमनेसामने आले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक या मुद्द्यांवरुन निशाणा साधत आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गट या कारवाईविरोधात मोर्चा काढणार आहे.