ईडीची धाडसत्र, सांगलीत खळबळ, बँक खात्यांची चाचपणी, बँकेचे चेअरमन म्हणतात….

ईडी अधिकाऱ्यांनी सांगलीत व्यापारी बंधूंच्या घरावर टाकलेल्या धाडीनंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. ईडी अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांचे बँक खाते देखील तपासले आहेत. ईडी अधिकाऱ्यांच्या या कारवाईवर राजारामबापू सहकारी बँकेचे चेअरमन शामराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय.

ईडीची धाडसत्र, सांगलीत खळबळ, बँक खात्यांची चाचपणी, बँकेचे चेअरमन म्हणतात....
Image Credit source: tv9
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jun 24, 2023 | 6:20 PM

सांगली : महाराष्ट्रात सध्या ईडीकडून सुरु असलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. ईडीचं मुंबईत सध्या धाडसत्र सुरु आहे. मुंबई महापालिकेत कथित कोविड सेंटरच्या घोटाळ्याप्रकरणी प्रशासनातील अनेक अधिकारी आणि काही लोकप्रतिनिधींची चौकशी देखील ईडीकडून केली जात आहे. असं असताना सांगलीतही ईडीकडून चौकशी सुरु आहे. अर्थात सांगलीतील कारवाईचा मुंबईतील कारवाईशी काहीच संबंध नाही. पण सांगलीत सुरु असलेल्या कारवाईमुळे देखील खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ईडीच्या तब्बल 60 अधिकाऱ्यांकडून ही कारवाई केली जात आहे. ईडी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी छापेमारी करुन आता बँक खात्यांची चौकशी केली जात आहे. दुसरीकडे ईडीची ज्या बँकेत चौकशी सुरु आहे त्या बँकेचे चेअरमन शामराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

“ईडीचे कारवाईला आम्ही घाबरत नाही”, असं मोठं वक्तव्य राजारामबापू सहकारी बँकेचे चेअरमन शामराव पाटील यांनी केलं आहे. “राजारामबापू बँकेने गेल्या 42 वर्षात कोणत्याही बँक व्यवहारात अनियमिता केली नाही”, असे स्पष्ट मत शामराव पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना व्यक्त केलं आहे. त्यामुळे ईडीची कारवाई आता कुठपर्यंत जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

सांगलीत ईडी अधिकाऱ्यांनी काल धाडी टाकल्या. विशेष म्हणजे या धाडींबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. सांगलीत इलेक्ट्रिक साहित्यांची विक्री करणारे व्यापारी दिनेश पारेख आणि सुरेश पारेख यांच्या घरावर सकाळी सात वाजेच्या सुमारास धाड टाकली दोन्ही भावांची बंगले हे आजूबाजूलाच आहेत. या बंगल्यावर ईडीचे पथकं दाखल झाले. ईडी अधिकाऱ्यांनी या दोन्ही व्यापारी भावांच्या घराची झाडाझडती घेतली.

ईडी अधिकाऱ्यांनी पारेख बंधू यांच्या घरावर छापा टाकण्याबरोबरच अरविंद लढ्ढा आणि ऋषिकेश लढ्ढा यांच्याही ठिकाणी छापेमारी केली. तसेच पिंटू बयानी या व्यापाऱ्याच्या इथेही छापा टाकण्यात आला. ईडीला या व्यापाऱ्यांनी पैशांची अनियमितता केल्याचा संशय आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली. या व्यापाऱ्यांची बँक खाती ही राजारामबापू बँकेत असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर ईडीकडून पारेख बंधू आणि इतर व्यापाऱ्यांच्या बँक खात्यांची माहिती मिळवण्याचं काम सुरु झालं.

ईडीचे अधिकारी राजारामबापू बँकेच्या मु्ख्य शाखेत संबंधित बँक खात्यांची चौकशी करण्यासाठी गेले. याबाबत विविध चर्चांना उधाण आल्यानंतर बँकेचे एम डी प्रदीप बाबर यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. “सांगली मधील ईडीने चौकशी केलेल्या व्यापाऱ्यांची खाती राजारामबापू बँकेत आहेत आणि त्या खात्याची चौकशी करण्यासाठी ईडी बँकेत आली होती. अन्य कोणत्याही खात्याची ईडीने माहिती किंवा चौकशी केली नाही. राजारामबापू बँकेमध्ये कोणतीही अनियमितता किंवा कोणताही गैरव्यवहार नाही”, असं बाबर यांनी स्पष्ट केलं.

दुसरीकडे ईडी अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीदेखील इस्लामपूर येथील पेठ रोडला असणाऱ्या राजारामबापू बँकेच्या मुख्य शाखेत ठाण मांडून चौकशी केली आहे. त्यावर राजारामबापू सहकारी बँकेचे चेरमन शामराव पाटील यांनी बँक व्यवहारात कोणतीही अनियमितता झालेली नाही, असं स्पष्ट केलं आहे.

खासदार राजू शेट्टी यांच्याकडून ईडी चौकशीचं समर्थन

ईडीच्या सध्या सुरु असणाऱ्या धाडीचे माजी खासदार राजू शेट्टींकडून समर्थन करण्यात आलं आहे. पण ईडीने धाडी घोटाळे करणाऱ्यांवर आणि दरोडे टाकणाऱ्ंयावर सुद्धा टाकावेत. मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधक, अशा शब्दांत राजू शेट्टींचे ईडी आणि केंद्र सरकारला टोमणे मारले आहेत. फक्त एखाद्या नेत्याला बदनाम करणे आणि आपल्या पक्षात येण्यासाठी धाडी नकोत, असा सल्लाही राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.

रात्री अडीच वाजता ईडीचे पथक मुंबईकडे रवाना

दरम्यान, ईडीच्या पथकाने काल दिवसभर धाडी टाकत झाडाझडती घेतली. ईडी अधिकाऱ्यांनी बँक खात्यांची देखील चौकशी केली. या सगळ्या चौकशीनंतर ईडी अधिकारी रात्री उशिरा अडीच वाजेच्या सुमारास मुंबईच्या दिशेला यायला निघाले. या धाडसत्रामुळे सांगतील विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us