तीन वर्षांपूर्वी शेतीपूरक व्यवसाय सुरू केला, वादळी वाऱ्याने होत्याचं नव्हतं झालं

| Updated on: May 01, 2023 | 9:20 PM

वडिलांचे छत्र हरवल्यावर या दोन तरुण भावंडांनी बँकेचे कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला होता. परंतु अचानक आलेल्या वादळी पावसाने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ते हवालदिल झाले आहेत.

तीन वर्षांपूर्वी शेतीपूरक व्यवसाय सुरू केला, वादळी वाऱ्याने होत्याचं नव्हतं झालं
Follow us on

अकोला : जिल्हात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिरसो येथील प्रतीक आणि आकाश राजेंद्र मेहरे या दोघा भावांनी शेतीसाठी पुरक व्यवसाय म्हणून तीन वर्षांपूर्वी लाखो रुपयांचे भांडवल उभारले. कुक्कुटपालन पालन व्यवसाय सुरू केला होता. या केंद्रात हजारो पक्षी वाढवून त्याची विक्री करायचे. परंतु रात्री मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस आल्याने कुक्कुटपालन शेडला ऊन, वारा, पाऊस यापासून पक्ष्यांच्या रक्षणासाठी लावलेले प्लॅस्टिक पडदे वादळाने उडून गेले. पोल्ट्री फॉर्ममध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संपूर्ण पक्षी भिजले.

तीन हजार कोंबड्यांचा मृत्यू

यात कोंबड्यांना बसण्यासाठी अंथरलेले कुटार आणि खाद्यही भिजले. रात्रभर प्रचंड वादळ आणि पाऊस सुरू झाला. भिजलेल्या तीन हजारांच्यावर कोंबड्यांचा थंडीने कुडकुडून मृत्यू झाला. पाच हजारांहून अधिक पक्षी असलेल्या पोल्ट्री फॉमधील 3 हजार कोंबड्याचा मृत्यू झाल्याने प्रतीक आणि आकाश मेहरे या दोन भावंडांचे 7 ते 8 आठ लाखांचे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

 

शासनाकडून मदतीची मागणी

वडिलांचे छत्र हरवल्यावर या दोन तरुण भावंडानी बँकेचे कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला होता. परंतु अचानक आलेल्या वादळी पावसाने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ते हवालदिल झाले आहेत. आम्ही दोघा भावंडांनी मोठ्या मेहनतीने कुक्कुटपालनाचा व्यवसाय उभा केला होता. अवकाळी पावसाने आणि वादळाने हजारो पक्षी मृत्यूमुखी पडल्याने किमान 7 ते 8 लाखांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा प्रतीक मेहरे यांनी व्यक्त केली.

मेंढपाळांचे एक कोटींचे नुकसान

दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात सोनाळा शिवारात सुमारे साडेपाचशे मेंढ्या मृत्युमुखी पडल्यात. यामुळे मेंढपाळ व्यावसायीकांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदगाव तालुक्यातील मेंढपाळ जामनेर तालुक्यात मेंढ्या चराईसाठी आलेले होते.

काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसासह जोरदार गारपिटीमुळे एकापाठोपाठ एक अशा शेकडो मेंढ्यांचा मृत्यू झालाय. यामुळे मेंढपाळ कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला होता. आज दुपारी महसूल विभागाचे अधिकारी यांच्यामार्फत घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला.