उद्धव ठाकरे उद्या एमआयएमशीही युती करू शकतात, आम्ही 51 टक्क्यांची…; चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टीका

उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले. बाळासाहेब ठाकरे असते तर हे कदापि शक्य झालं नसतं. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नेहमी विरोध केला.

उद्धव ठाकरे उद्या एमआयएमशीही युती करू शकतात, आम्ही 51 टक्क्यांची...; चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टीका
chandrashekhar bawankule
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 25, 2023 | 7:23 AM

गोंदिया: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युतीवर जोरदार टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणजे भीमशक्ती नाही. आमच्याकडेही भीमशक्ती आहे, असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांचा काहीच भरवसा नाही. ते उद्या एमआयएमशीही युती करतील, अशी खोचक टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी पक्षासोबत कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपचं काहीही करू शकत नाही. काल शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. पण बाळासाहेब आंबेडकर म्हणजे भीमशक्ती नाही. आमच्याकडे सुध्दा भीमशक्ती आहे. त्यामुळं आम्ही 51 टक्याची तयारी केली आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

कितीही पक्ष एकत्र आले तरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सारखे दोन सरदार महाराष्ट्राला मिळाले आहेत. तेच पुरुन उरतील, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

कुणाच्याही मागे लागलो नाही

शरद पवार यांच्या भीतीमुळे भाजप राष्ट्रवादीच्या मागे लागल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला होता. त्यालाही बावनकुळे यांनी उत्तर दिलं. आम्ही कुणाच्या मागे लागलो नाही. उलट राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आमच्या संपर्कात येत आहेत. आम्ही शरद पवारांकडे कुठलीही मागणी केली नाही. किंवा मदतही मागितली नाही, असंही ते म्हणाले.

सरकारी वकील तेच करत होते

राज्यातल महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती. तेव्हा भाजपच्या नेत्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकवण्याचं षडयंत्र सुरू होतं. त्यावेळी सरकारी वकील तेच काम करत होते, असा आरोपही त्यांनी केला.

तुमच्याकडे किती आमदार उरतील

आता 40 आमदार निवडून आले. यापुढे सहाही आमदार निवडून येणार नाही, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला होता. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांची सत्ता होती तेव्हा 40 आले. आता तर आमची सत्ता आहे. मग विचार करा.

आता जर बहुमत सिद्ध करायचं झाला तर आमचे 184 आमदार होतील. राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा आमच्याकडे येतील. तेव्हा त्यांच्याकडे किती आमदार उरतील?, असा टोलाही त्यांनी लगावला. विकास करायचं असेल तर केंद्र सरकारच्या मदतीनेच शक्य आहे, असंही ते म्हणाले.

तर शक्य झालं नसतं

भाजप ही एमआयएमची बी टीम आहे, असं अंबादास दानवे म्हणाले होते. दानवे यांच्या या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले. बाळासाहेब ठाकरे असते तर हे कदापि शक्य झालं नसतं. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नेहमी विरोध केला.

शिवसेना मोडीत काढेन पण प्रकाश आंबेडकर यांच्या तत्त्वाशी कधीच जुळवून घेणार नाही, असं बाळासाहेब ठाकरे सांगायचे. तरीही यांनी युती केली. उद्या उद्धव ठाकरे हे एमआयएमशीही युती करतील, असा टोला त्यांनी लगावला.