पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे म्हणाले होते, मी चुकलो…; दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट काय?

कोकणापासून उद्धव ठाकरे दूर गेले. त्यांच्याबरोबरची माणसंही दूर गेली. कोकणासाठी काही केलं नाही. सिंधुरत्न योजनेसाठी फक्त 25 कोटी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आहे. त्यांचं करीअर ठाण्यात घडलं. त्यांनी कोकणासाठी असंख्य निर्णय घेतले, असं ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे म्हणाले होते, मी चुकलो...; दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट काय?
deepak kesarkar
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 19, 2023 | 2:27 PM

कोल्हापूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलो ही चूक झाली. मुंबईत गेल्यावर चूक दुरुस्त करतो, अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. दीपक केसरकर यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरीतील खेडमधील सभेपूर्वीच दीपक केसरकर यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. कोल्हापूर येथे आले असता ते बोलत होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडा हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगत होतो. आम्ही फसवलं नाही. तुम्हीच आम्हाला सांगितलं, तुम्ही निघून जा. आणि आता जनतेला खोटं सांगत आहात. खोटं तरी बोलू नका. तुम्ही स्वत: पंतप्रधानांसमोर कबुल केलं होतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याची तुमच्याकडून चूक झाली. हिंदुत्वाचा विचार सोडण्याची चूक झाली आहे. महाराष्ट्रात गेल्याबरोबर मी चूक दुरुस्त करेन, असं आश्वासन देऊन तुम्ही दिल्लीतून आला. पण इथं आल्यावर तुम्ही शब्द मोडलेला असेल तर कोणी कुणाला फसवलं हे राज्यातील जनतेला समजलं पाहिजे, असा खळबळजनक गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला.

फायदा घेता आला नाही

मी हे घडवू शकलो केवळ देवाची कृपा आहे. पण त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना घेता आला नाही. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फसवलं. म्हणून तुम्हाला फसवलं म्हणून त्याचा दोष दुसऱ्यावर का टाकता? आम्ही राज्यासाठी जे काम करत आहोत, त्याला आशीर्वाद दिला असता तर चांगलं झालं असंत, असा टोला केसरकर यांनी लगावला.

हेटाळणी केली गेली

यावेळी त्यांनी कोकणातील विकासाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. काजू धोरणामुळे कोकणाचा कायापालट होणार होता. काजू धोरणासाठी समिती नेमण्यात आली होती. मी त्या समितीत होतो. अडीच वर्ष त्या समितीची हेटाळणी झाली. केसरकर समिती, केसरकर समिती म्हटलं गेलं. त्याकडे हास्याने बघितलं गेलं. आमच्याच अहवालानंतर कोकणाला 1300 कोटी रुपये दिले गेले. 200 कोटी काजू महामंडळासाठी देण्यात आले. कुचेष्टा करायची.. हसण्यावारी न्यायचं… असं करायचं नसतं. कोकणी जनता कधीच काही मागत नाही. याच कोकणी जनतेच्या जीवावर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना मोठी केली. या जनतेने बाळासाहेबांना खूप प्रेम दिले, असं ते म्हणाले.

आदित्य ठाकरे कुचेष्टेने हसत होते

ज्यावेळी अजितदादा अर्थमंत्री झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे साडेचारशे कोटी रुपये काढून घेण्यता आले. तेव्हा उद्धव ठाकरे काहीही बोलले नाही. अडीचशे कोटीचा जिल्हा नियोजन मंडळाचा आराखडा होता. तो दीडशे कोटीवर नेला. तेव्हाही उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत. ज्यावेळी अजित दादा उत्तर देत होते. त्यावेळी आदित्य ठाकरे कुचेष्टेने हसत होते. ही त्यांच्या लेखी कोकणी जनतेची किंमत आहे. कोकणाच्या प्रश्नाबाबतची आस्था आहे. आजही ते व्हिडीओ काढून पाहू शकता. ही वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. कोकणात सर्वाधिक भूविकास बँका होत्या. या भूविकास बँकांना न्याय दिला गेला नाही, असंही त्यांनी सांगितलं.

तेव्हाच विकलो गेलो असतो

एवढी लोक निघून का गेली? आमच्या विभागावर अन्याय होत असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी अन्याय करत असेल तर आम्ही का थांबावं? तुम्ही आम्हाला खोके खोके म्हणता. आदित्य ठाकरे यांना लहानपणापासून खोक्यांसोबत खेळण्याची सवय असेल. आम्हाला नाही. आम्ही जनतेसोबत राहिलो म्हणून आम्ही आमदार झालो. विकल्या जायचंच होतं तर अडीच वर्षापूर्वीच विकल्या गेलो असतो, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us