छातीभर पुराच्या पाण्यात थरार… घराच्या दरवाज्यावरून गरोदर महिलेला प्रसुतीसाठी नेले, समाजसेवक बनले देवदूत
Pregnant Woman Rescued : पालघरमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असताना माणुसकीचा एक हृदयस्पर्शी प्रत्यय पाहायला मिळाला. छातीभर पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका गरोदर मातेला वाचवण्यासाठी चक्क घराचा दरवाजा स्ट्रेचर बनवण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाने कहर केला. अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला. अशातच आता पालघरमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असताना माणुसकीचा एक हृदयस्पर्शी प्रत्यय पाहायला मिळाला. छातीभर पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका गरोदर मातेला वाचवण्यासाठी चक्क घराचा दरवाजा स्ट्रेचर बनवण्यात आला. जीवाची पर्वा न करता काही देवदूतांनी पूर ओलांडत महिलेला रुग्णालयात पोहोचवलं आणि अखेर तिच्या कुशीत गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
गरोदर महिलेला अचानक प्रसूती कळा
पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. पालघर तालुक्यातील केळवे रोड भागात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल होती. हनुमानपाडा परिसरात गरोदर महिला प्रियांका यादव यांना अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. मात्र त्याचवेळी परिसरात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे आता दवाखान्यात कसं जायचं हा प्रश्न समोर होता.
घराचा दरवाजा बनला स्ट्रेचर…
आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन आशा सेविका दिव्या घरत, समाजसेवक चेतन गावड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. वाहन जाण्याची शक्यता नसल्याने त्यांनी एका घराचा दरवाजा काढून त्याचा स्ट्रेचर म्हणून वापर केला. त्या दरवाजावर प्रियांका यांना झोपवून छातीभर पाण्यातून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पूराच्या पाण्याचा धोका पत्करत या मदतकर्त्यांनी प्रियांका यादव यांना सफाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने रुग्णालयात त्यांची सुखरूप प्रसूती झाली आणि त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला.
चेतन गावड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक
समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या माता आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठणठणीत असून, दोन जीव वाचवण्यासाठी धाडस दाखवणाऱ्या चेतन गावड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संकटाच्या काळात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा हा प्रत्यय देणारा प्रसंग ठरला आहे.