
गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे. या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला. मुली ताब्यात घेतल्या. हा डान्सबार आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी काल विधान परिषदेत केला होता, त्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले कदम?
अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. मालकाला खूश करण्यासाठी रामदास कदमला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधीमंडळ कायदे मंडळ आहे. नियमाने काम चालतं पण परब यांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे मी सभापतींना पत्र देतोय की चुकीचे नियम दाखवून एखाद्या राज्यमंत्र्याला बदनाम करता येतं का. केलं असेल तर अनिल परबांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, १९९० पासून सावली बार सुरू आहे. माझ्या पत्नीच्या नावे आहे. व्यवसाय करण्यासाठी कुणाची अडचण नाही. शेट्टी नावाच्या व्यक्तीला ३० वर्षांपासून ते चालवायला दिलं आहे. या ३० वर्षात आम्ही तिथे पायही ठेवला नाही. पण तिथे १४ महिलांचं परमिशन आहे वेटरसाठी, डान्सबार नाही. तो डान्सबार नाही. अनिल परब यांनी डान्सबार आहे सांगून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, तो चुकीचा आहे. पोलिसांनी पाहणी केली तेव्हा एका गिऱ्हाईकाने लेडीज वेटरवर पैशाची उधळण केल्याचं कळलं. म्हणून आम्ही ताबडतोब शेट्टीला बाहेर काढलं. त्याच्यावर कारवाई केली. मुलींचं वेटरचं लायसन्स रद्द केलं. आम्ही आर्केस्ट्राचं लायसन्स होतं तेही रद्द केलं. आणि गेल्या दोन महिन्यांपासून ते हॉटेलही बंद केलं. अशा पद्धतीने घाणेरड्या डान्सबारचे पैसे आम्ही घेत नाही.
मी त्याबाबत माहिती घेतली. अशा पद्धतीने मुंबई प्रोव्हिजन अॅक्ट लायसन्स होल्डर हा जबाबदार असतो. पण नव्या अॅक्टमध्ये म्हणजे ऑस्किन डान्स इन होटल अॅक्ट 2016 च्या कलम ८नुसार जो माणूस हॉटेल किंवा बार चालवतो त्याचीच सर्व गोष्टीची जबाबदारी असते. अॅग्रीमेंटवर हॉटेल किंवा बार चालवतो त्याची जबाबदारी असते. मालकाची जबाबदारी नसते. हेतुपुरस्सर माझ्या पत्नीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तो डान्सबार नव्हता. डान्सबार तिथे नव्हता. फक्त आर्केस्ट्रा होता. १४ मुलींचं लायसन्स आहे. नाईटला काम करणाऱ्यांना ताब्यात घेतलं. त्या २२ दाखवल्या. त्याची चौकशी करण्यास सांगितलं.
मी सर्व लायसन्स पोलिसांना दिले. यापेक्षा अजून काय करणार. अनिल परब यांच्यासाठी नियम बदलणार का? मालक जबाबदार नाही. चालक जबाबदार आहे. कायद्यात म्हटलं आहे. मग रामदास कदमांच्या पत्नीला बदनाम करण्यासाठी नियम बदलणार का. रामदास कदमांच्या पत्नीने व्यवसाय करणं गुन्हा आहे का. जो कायदा आहे. त्यानुसार जो चालवणारा इसम जबाबदार असतो. त्याला जबाबदार धरलं. हॉटेल काढून घेतलं. लायसन्स रद्द केलं आहे. हॉटेल बंद केलं आहे. यापेक्षा अजून नैतिक काय करायचं? असा सवाल यावेळी कदम यांनी केला आहे.
रामदास कदम यांच्या पत्नीला अडचणीत टाकायचं असेल तर नियम बदलावा लागेल. नियमाने चालणार की अनिल परब म्हणतात ते करायचं. परब यांनी चुकीचं कलम सांगितलं. त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे परबांवर कारवाई होणार की नाही हे आम्ही पाहणार आहोत. अनिल परब यांची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी चुकीचा कायदा सांगितला, आणि आमची बदनामी केली, असं कदम यांनी म्हटलं आहे.