
गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. यावरुन अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या मुद्द्यावर भाष्य केले. “भारत पाकिस्तानच्या हवाई दलाचे मोठे नुकसान केले असले. तरी युद्धविरामामुळे भारताचे प्रचंड नुकसान झाले”, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.
भारताच्या वतीने सांगितले जात आहे ते खरं आहे. गेल्या २ दिवसात पाकिस्तानची २० टक्के हवाई दलाची ताकद नष्ट केली हे खरं आहे. युद्धावर वर्चस्व मिळवत असताना अचानक युद्धविराम झाले. त्यात भारताचे प्रचंड नुकसान झाले आहे. आज आपण पाहिले की मिलिटरीला पुन्हा एनकाऊंटर करण्याची वेळ आली आहे. युद्ध थांबवण्याची मागणी आली. त्यावेळी भारतात त्यांचे अड्डे किती, त्यांनी ट्रेन केलेली माणसे किती. अस्तित्व आहेत हे माहिती करून घेतली असती, सगळ्या गोष्टी पाकिस्तानकडून मिळवून घेतल्या असत्या तर आर्मीला जम्मूत गाव गाव हिंडून कोण अतिरेकी आहे हे शोधण्याची गरज पडली नसती, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकृतपणे काही बोलत नाहीत, तोपर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य खरे मानावे लागेल, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. पाकिस्तान दहशतवादी ‘एक्सपोर्ट’ करत असून, जगातील काही संघटना आणि सरकार त्यांना पाठिंबा देत आहेत. भारताने हे थांबवण्याची क्षमता दाखवावी”, असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केले.
“चीनने काही गावांची नावे बदलल्याचे वृत्त खरे असले, तरी चीनने घुसखोरी केली आहे की नाही, याबद्दल मला काही माहिती नाही. बोधगयातील शांततापूर्ण आंदोलनावर प्रशासनाने बळाचा वापर करणे चिंताजनक आहे. तेथील भिक्षूंना ताब्यात घेतले जात आहे”, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.
“काँग्रेस नेतृत्वाने सध्याच्या परिस्थितीत ‘कच खाल्ली’ आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला. रामदास आठवले यांच्या ‘मुंबईची इस्लामाबाद होऊ देऊ नका’ या वक्तव्यावर ‘तुमच्याकडे गहू नाही आणि सगळ्या पुऱ्या लाटायला चालला आहात’, अशी टीका त्यांनी केली. सोफिया कुरेशी प्रकरण दुर्दैवी असून, पंतप्रधान मोदींमध्ये आपल्या पक्षातील लोकांवर कारवाई करण्याची हिंमत नाही, त्यामुळे न्यायालयात जाऊन कारवाई करावी लागते”, असे आंबेडकर म्हणाले.