24 तास पाळत, धमक्यांचे सतत फोन अन्…; प्रशांत अंबी ती यादी घेऊन थेट पोलिसात, नेमकं काय घडलं?
आमदार संजय गायकवाड कथित धमकी प्रकरणात प्रशांत अंबी यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट हायकोर्टात रिट याचिका दाखल केली आहे, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

गेल्या अनेक दिवसांपासून दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रशांत अंबी यांचा संघर्ष सुरू आहे. हा संपूर्ण संघर्ष महाराष्ट्र पाहत आहे. आता या प्रकरणात न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेबद्दल प्रशांत अंबी यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. मात्र, आता पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्णपणे निष्पक्षपातीपणे करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्याकडून आलेल्या कथित धमकीच्या फोननंतर सुरु असलेल्या या वादाला आता कायदेशीर आणि राजकीय वळण मिळाले आहे.
‘पानसरे प्रकरणात न्याय मिळाला नाही, यात तरी मिळावा’
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि तपासाच्या संथ गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना प्रशांत आंबी यांनी कॉ. गोविंद पानसरे प्रकरणाचा दाखला दिला. ते म्हणाले, पानसरे यांच्या हत्येचा तपासही पोलीस करत आहेत. मात्र अद्याप ते संबंधितांना न्याय देऊ शकलेले नाहीत. किमान या प्रकरणात तरी पोलिसांनी तीच चूक पुन्हा न करतानिष्पक्षपाती चौकशी करावी, असे प्रशांत अंबी म्हणाले.
संबंधित व्यक्तीने स्वतः गुन्हा कबूल केला असून, ती ऑडिओ क्लिप स्वतःचीच असल्याचे मान्य केले आहे. आरोपीने स्वतः गुन्हा कबूल केला असताना पोलीस आता नक्की कसली चौकशी करत आहेत? माझी राजारामपुरी पोलिसांना विनंती आहे की, जे पोलीस आता चौकशीला निघाले आहेत, त्यांनी चौकशीकामी वेळ न घालवता थेट अटक करावी, अशी आक्रमक मागणी प्रशांत अंबी यांनी केली.
२२ तारखेनंतर धमक्यांचे सत्र; कार्यकर्त्यांकडून पाळत
प्रशांत अंबी यांनी संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम सांगताना स्पष्ट केले की, २२ तारखेला आमदार संजय गायकवाड यांचा धमकी आणि शिवीगाळ करणारा फोन आला होता. सुरुवातीला हे प्रकरण शांत होते, मात्र जेव्हा प्रसारमाध्यमांनी हा विषय उचलून धरला, तेव्हापासून मला येणाऱ्या धमक्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन करून शिवीगाळ केली जात आहे. “तू कुठे फिरतोस, कुठे उठतोस-बसतोस, या सगळ्या गोष्टींवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, असे ते सतत सांगत असतात. माझ्यावर पाळत ठेवली जात आहे, असा खळबळजनक आरोप प्रशांत अंबी यांनी केला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्यावर वेळेत कोणतीही कठोर कारवाई झाली नाही आणि याच धोरणामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचे धाडस वाढले आहे, असेही ते म्हणाले.
संशयास्पद नंबरची यादी पोलिसांना देणार; हायकोर्टात रिट याचिका दाखल
सुरुवातीला मी असा विचार केला होता की, फोन करणारे कार्यकर्ते माझ्याच विचाराचे किंवा स्पर्धा परीक्षा देणारे तरुण विद्यार्थी असतील. त्यांना समजत नसेल म्हणून सोडून देऊ या भावनेने मी दुर्लक्ष केले. मात्र, आता हा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा धमक्यांचा त्रास थांबत नसल्याने आता मी लवकरच कायदेशीर रित्या कारवाई करणार आहे. मला वेगवेगळ्या नंबरवरून वेगवेगळ्या लोकांना फोन करायला लावून धमकावले जात आहे. या सर्व संशयास्पद नंबरची एक सविस्तर यादी तयार करण्यात आली असून, या सगळ्यांविरुद्ध राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचे प्रशांत अंबी यांनी स्पष्ट केले.
न्यायालयीन लढायची सुरुवात आम्ही अगोदर पासूनच केली आहे. न्यायालयाने त्यांच्या चौकशीला परवानगी दिली असली, तरी पुढे काय होईल हे आम्हाला माहीत नाही. पोलिसांनी केलेल्या तपासावर विसंबून न राहता आम्ही आता माननीय हायकोर्टात (उच्च न्यायालय) ‘रिट याचिका’ (Writ Petition) दाखल केली आहे. जोपर्यंत या प्रकरणात दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमची ही लढाई थांबणार नाही, असेही ते म्हणाले.