5 तोळं सोनं चोरीला, पालकमंत्री चांगलेच भडकले, ओमराजेंच्या मतदारसंघात काय घडलं?
घडलेला प्रकार समजताच प्रताप सरनाईक यांनी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्याकडून प्रकरण समजून घेतले. तसेच पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी चांगालच संताप व्यक्त केला.

Dharashi District : पक्षांतर केलं तेव्हापासून धाराशीवचे खासदार ओमराजे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. याच ओमराजेंचा मतदारसंघ आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. येथे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चोरीले गालेले पाच तोळे सोने पोलिसांना सापडत नाहीये. हीच बाब धाराशीवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. त्यांनी थेट पोलीस अधिक्षकांनाच सुनावलं आहे. तुमच्याकडून सोन्याचा शोध घेतला जात नसेल तर मला सांगा, मी संबंधित व्यक्तीला त्या सोन्याचे पैसे देऊन टाकतो, असं सरनाईक संतापून म्हणाले आहेत. आता संपूर्ण जिल्ह्यात चोरीला गेलेले पाच तोळे सोने तसेच सरनाईक यांनी व्यक्त केलेला संताप चर्चेचा विषय ठरत आहे.
नेमकं काय घडलं?
आज स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रताप सरनाईक हे धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते धाराशीवमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमात एक तरुण आणि त्याची आई आले. या दोघांनी सरनाईक यांच्यापुढेच बऱ्याच दिवसांपासून आमचे 5 तोळे सोने चोरीला गेले आहे, ते अद्याप सापडलेले नाही अशी व्यथा मांडली. ही बाब समजल्यावर प्रताप सरनाईक चांगलेच संतापले.
प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले?
घडलेला प्रकार समजताच प्रताप सरनाईक यांनी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्याकडून प्रकरण समजून घेतले. तसेच पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी चांगालच संताप व्यक्त केला. “तुम्हाला चोरीला गेलेले सोने मिळत नसेल तर त्याचे पैसे किती होतात ते बघा, मी त्याचे पैसे देतो,” अशा शब्दांत सरनाईक यांनी पोलीस अधीक्षकांना सुनावलं. चोरीचा तपास रखडल्याने पालकमंत्री संतप्त झाले.
चोरीला गेलेलं सोनं परत मिळणार का?
दरम्यान, माय-लेकरांनी आपली व्यथा थेट पालकमंत्र्यांपुढे मांडल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहत. सोबतच चोरीला गेलेले हे सोने नेमके कधी मिळणार? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.