सोसाट्याचा वारा, तुफान वादळ, घराचे पत्रे कागदासारखे उडाले; या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं

Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांचे पत्रे उडाले.

सोसाट्याचा वारा, तुफान वादळ, घराचे पत्रे कागदासारखे उडाले; या जिल्ह्यांना पावसाने झोडपलं
Heavy Rain In Maharashtra
Image Credit source: Google
| Updated on: May 24, 2026 | 9:13 PM

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातील मालेगावला आज अवकाळीचा तडाखा बसला. वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह आज जोरदार पाऊस कोसळला. दिवसभराच्या उकाड्यानंतर आलेल्या पावसामुळे शहरी भागात कमालीचा गारवा निर्माण झाला. मात्र या पावसामुळे ग्रामीण भागात शेतकरी वर्गाचे हाल झाले. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याचीही माहिती समोर आली आहे.

धाराशिवमध्ये घरांचे पत्रे उडाले

धाराशिव जिल्ह्यात आज दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला असून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाने हजेरी लावली. या अवकाळी वातावरणामुळे काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या असून जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. वाशी तालुक्यातील नांदगाव शिवारामध्ये शेतकरी मारुती डांगे यांचे राहण्यासाठी उभारलेले पत्र्याचे शेड जोरदार वाऱ्यामुळे उडून गेले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेडचे मोठे नुकसान झाले असून घरातील साहित्याचेही नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसान पाहून शेतकरी मारुती डांगे यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते.

जळगाव जिल्ह्यातही पावसाच्या सरी

जळगावच्या चोपडा , जळगाव , यावल तालुक्यात वादळी वाऱ्यासह मानसून पूर्व पावसाने हजेरी लावली. चोपडा तालुक्यातील अडावद धानोरा वर्डी, खर्डी लोणी पंचक तसेच यावल तालुक्यातील डांभुर्णीसह परिसरात व जळगाव तालुक्यातील विदगाव परिसरात पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळी, तूर, मका, पपई व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच चोपडा तालुक्यातील खर्डी गावात तुफान वादळी वाऱ्यामुळे तीन घराची पडझड झाली. वादळी वाऱ्यामुळे वृक्ष पडल्यामुळे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

शिर्डीतही पावसाच्या सरी

अहिल्यानगर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. कोपरगाव, शिर्डीसह राहाता तालुका आणि परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ पहायला मिळाली. या पावसामुळे सकाळपासून जाणवत असलेल्या उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली.

येवल्यात कांदा पिकाचे नुकसान

नाशिकच्या येवला तालुक्यात तीन दिवसांपासून मान्सून पूर्व वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. काल सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळामध्ये कोटमगाव येथील शेतकरी अशोक लहरे यांच्या शेतातील कांदा चालीवरती आंब्याचे झाड कोसळले. यामुळे कांदा चाळीत साठवलेल्या दोन ते तीन ट्रॅक्टर कांद्याचे नुकसान झाले आहे.

बीडमध्ये वादळी वारे

बीड तालुक्यातील पिंपळवाडी परिसरात वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे. या भागातील काही झाडांची देखील पडझड झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहेय. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Follow Us